आमदारकीचे डोहाळे लागलेल्या प्रा. झोळ यांनी गोविंदपर्वच्या बीलाबद्दल बोलावे
वाशिंबे प्रतिनिधी –
गावपातळीवर आलेले अपयश आणि गोविंदपर्व मध्ये शेतकऱ्यांची थकलेली बीलाकडे दुर्लक्ष करण्यासाठी मकाईचा वापर केला जात आहे. प्रा. झोळ यांचे गावातुन डिपॉझीट जप्त झालेले असताना त्यांनी मोठ्या गप्पा मारु नये. स्वतःचे आमदारकीचे डोहाळे पूरविण्यासाठी मकाई सहकारी साखर कारखाना निवडणूकीचा वापर करणे चुकीचे असुन मकाईच्या माध्यमातून स्वता : ची प्रतिमा सुधरवण्याची चालवलेला उठारेटा थांबवून गोविंद पर्वच्या बिलाबद्दल बोलावे असे आव्हान बागल गटाचे पश्चिम भागाचे नेते गणेश झोळ यांनी व्यक्त केले आहे.
झोळ यांनी बोलताना सांगितले, आदिनाथ बिनविरोध करण्याची भाषा करणाऱ्यांनी जनाधार नसलेल्या लोकांना बरोबर घेऊन मकाईची निवडणूक लावण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. निवडणूक जिंकणार नाही माहीत असतानाही फक्त विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मकाईची निवडणूक लावून बागल गटावर टीका करणे व चर्चेत राहणे हा या मागील एकमेव उद्देश आहे. प्रा. झोळ यांना मकाई ची निवडणूक लागताच अचानक स्वता : च्या राजकीय स्वार्थासाठी मकाई बद्दल पुतनामावशीचे प्रेम निर्माण झाले आहे.
तत्पूर्वी गोंविदपर्व कारखान्यातील शेतकरी, वाहतूकदार, कामगार यांची ऊसबिल, कामगारांचे वेतन, वाहतूकदारांची देणी या बद्दल प्रा. झोळ यांनी आधी बोलायला हवे. ते स्वतःला शेतकऱ्यांचे काळजीवाहू समजत असतील तर उभारणी काळापासून गोविंदपर्वच्या बोर्डात असताना देणी आणि सोलापूर डि.सी.सी. चे कोटय़वधी रूपये थकवून संस्थेपासून पळ काढण्याऐवजी बागलांप्रमाणे प्रायव्हेट प्रॉपर्टी गहाण ठेवून ही देणी देण्याचे कर्तव्य का पार पाडले नाही? ज्यांना वाशिंबे ग्रामपंचायत निवडणूकीत अनामत रक्कम ही राखता आली नाही त्यांनी मकाई साखर कारखान्याबद्दल बोलूच नये.
निव्वळ आमदारकीचे डोहाळे लागलेत म्हणून सभासदांची दिशाभूल करु नये. आगामी काळात दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वाखाली मकाई सहकारी साखर कारखान्याची यशस्वी वाटचाल होणार आहे असे गणेश झोळ यांनी बोलताना सांगितले.