थकबाकी पाणीपट्टीचा भरणा करावा व पाणी मागणी करावी अन्यथा …
करमाळा समाचार – विशाल घोलप
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी हंगाम २०२५ चे सिंचन आवर्तन लवकरच सुरू करण्यात येणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील मागील थकबाकी पाणीपट्टीचा भरणा करावा व पाणी मागणी करावी असे आवाहन कुकडी डावा कालवा उपविभागीय अधिकारी एस एस राजगुरु यांच्या वतीने करण्यात आले आहे. अन्यथा लाभधारकांना सिंचनाचा लाभ मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे.

दहिगाव उपसा सिंचन योजना या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यासाठी जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली भीमा उजनी प्रकल्प व त्यावरील योजनांचा सिंचन आवर्तन पाणी वापराच्या दृष्टीने कालवा समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी हंगामा करिता आवर्तन कार्यक्रम व पाणी वापरास मान्यता मिळालेली आहे. त्या अनुषंगाने दहिगाव उपसा सिंचन योजना उन्हाळी हंगामचे आवर्तन लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी मागील थकबाकी पाणीपट्टीचा भरणा उपविभागीय अधिकारी कुकडी डावा कालवा करमाळा या कार्यालयाकडे लवकर करावा. तसेच विहित नमुन्यातील पाणी मागणी अर्ज फॉर्म नंबर ७ भरून उपविभागाकडे आपली पाणी मागणी नोंदवावी वेळेत करावी. मागणी प्राप्त न झाल्यास लाभधारकांना सिंचनाचा लाभ मिळणार नाही अशा सूचना संबंधित विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.