आ. संजयमामा पत्रकारांवर संतापले ; उजनीच्या पाण्यावरुन आपली भुमीका केली स्पष्ट
करमाळा समाचार
करमाळा तालुक्याचे राजकारण उजनीच्या पाण्यावरून तापलेले असताना अनेकांनी सोशल माध्यमांमधून आमदार संजय मामा शिंदे काहीच का बोलत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेट म्हणून उजनी पाणी देऊन ते काहीच बोलत नसल्याबाबत अनेकांनी वक्तव्य केले होती. त्या वक्तव्याचा आमदार संजय मामा शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला असून उजनीचे एक थेंबही पाणी कुठे जाऊन देणार नाही अशी भूमिका बोलून दाखवली आहे.

संजयमामा शिंदे यांनी यापद्धतीने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे… माझ्या व माझ्या नेत्याच्या विरोधक व काही खोडसाळ पत्रकार माझ्या विरोधात कायम बातम्या देतात. माझे नेते अजित पवार कुटूंबीय यांच्या संदर्भात माझ्या जीवनात असाधारण महत्त्व आहे आणि ते मी हृदयात जपलंय, त्याचा इतरांच्या सारखा बाजार कधीच मांडला नाही, व त्या भांडवलावर कधीच कुठलं पद मिळवले नाही वा कोणत्याही संस्था वाचवण्यासाठी त्याचा वापर केला नाही. जेव्हा कधी वेळ आली तेव्हा इतर नेत्यांसारखा पळ सुध्दा काढला नाही, शेवटच्या क्षणी नेत्यांनी जो आदेश दिला तो मी पाळला आहे.भलेही त्यात माझा राजकीयत नफा तोटा झाला असेल.

तसेच उजनीच्या ५ टीएमसी पाण्या संदर्भात मी जाहीर पणे सांगतो जर चुकीच्या पद्धतीने काही घडल्यास मी सोलापूर जिल्हा वासीयांच्या सोबत खांद्याला खांदा लावुन लढेन. गरज पडल्यास मी माझ्या मतदार संघासाठी व जिल्ह्यातील जनतेसाठी सर्वस्व पणाला लावेन.पण उजणी धरणांमधलं सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी १ थेंबही इतरत्र वळवू देणार नाही अशी प्रतिक्रिया आ. संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.