आमसभेत मस्तमौला अधिकारी ; लोकांच्या प्रश्नाला कामचलाऊ उत्तरे – दोघांवर कारवाईच्या सुचना
करमाळा समाचार
दहा वर्षानंतर झालेल्या आमसभेत अधिकारी वर्ग अपेक्षित असे कामकाज करताना दिसून आला नाही. शिवाय उपस्थित लोकांच्या प्रश्नांना केवळ काम चालू उत्तरे देऊन वेळ मारून नेताना दिसून आला. अशा परिस्थितीत ग्राम सडक योजनेचे प्रमुख सभेला अनुपस्थितीत होते. तर जलजीवन मिशन वरून पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना मात्र घेरण्यात आले व त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. आमदार नारायण पाटील यांनी प्रत्येक विभागाला वेळोवेळी सूचना दिल्या असल्या तरी अधिकारी पुढे याचे काय करणार हा मोठा प्रश्न आहे.

लोकांचे प्रश्न मागील दोन ते पाच वर्षांपासून रखडलेले असल्याचे या बैठकीत दिसून आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी इथून पुढे करू किंवा आमसभा जाहीर झाल्यापासून काम केले आहे असे उत्तरे देताना दिसून आले. केवळ कार्यवाही करू किंवा केली जाईल अशी उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळताना दिसत होते. मुळातच मागील महिनाभरापासून संबंधित अधिकाऱ्यांकडे सर्व प्रश्न असतानाही त्याच्यावर ठोस काय करू शकतो हे न सांगितल्याने बैठकीदरम्यानच आमदार नारायण पाटील तसेच तहसीलदार शिल्पा ठोकडे या संबंधित अधिकाऱ्यांवर कडाडलेले दिसले.

सदरची आमसभा सकाळी साडेअकरा वाजता सुरू झाली. तर सायंकाळी पाच वाजता आटोपण्यात आली. बऱ्याचशा लोकांचे प्रश्न अद्यापही विचारण्यात राहून गेल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर मुळातच दहा वर्षातून का होईना आमसभा घेण्यात आली यात काही जणांनी समाधान व्यक्त केले. उर्वरित प्रश्न संबंधित विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन सोडल्या जातील असे आश्वासनही यावेळी आमदार पाटील यांनी दिले. तर ज्यांचे कोणाच्या तक्रारी असतील त्यांनी पाटील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.
दहिगाव उपसा सिंचन योजनेची पाणी उपसा पातळी ४९० वरून ४८५ मीटर करण्याबाबत…
तालुक्यातील पूर्व भागाची वरदायिनी दहिगाव उपसा सिंचन योजना कार्यवाहीत झालेली असून २२ गावातील दहा हजार पाचशे हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे. परंतु उजनी येथील पंपग्रहाची पाणी उचलण्याची पातळी उंची ४९० मीटर आहे. त्यामुळे करमाळा तालुक्याला हक्काचे पाणी मिळत नाही. भीमा सीना बोगदा ४८८.२० मीटर, मराठवाड्यासाठी जाण्यासाठी योजनेची ४८७ मीटर आहे. सदर योजनेची पाणी उचलण्याची पातळी दहिगाव उपसा सिंचन योजनेपेक्षा खाली असल्याने दहिगाव योजना लवकर बंद होते. तरी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी उचलण्याची पातळी उंची ४८५ मीटर करावी असा ठराव आमसभेत आमदार नारायण पाटील यांच्या वतीने घेण्यात आला.
नगरपरिषदे विरोधात …
संबंधित आमसभेच्या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळ पाणीपुरवठा योजना पंतप्रधान ग्राम सडक योजना भूमी अभिलेख महावितरण या कार्यालयाशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. तर करमाळा नगर परिषदेचे अधिकारी केवळ मोजक्या लोकांसाठी काम करत असल्याची तक्रार यावेळी सुनिल सावंत, बबन चांदगुडे, शशिकांत पवार यांच्याकडून करण्यात आली. तर गावातील अतिक्रमण व पाणी पुरवठ्याबाबत जाब विचारण्यात आला.
मनसेचे तालुकाध्यक्ष संजय घोलप ..
तालुक्यातील सौर पंप आग्रह करून शेतकऱ्यांना नवीन वीज जोडणी दिली जात नाही सौर पंपच घ्यावे यासाठी दबाव टाकला जात आहे. जागा नसताना पंप कुठे टाकणार त्यांच्या सुविधा कशा देणार असा प्रश्न मनसेचे तालुका अध्यक्ष संजय घोलप यांनी विचारला. तसेच महावितरणचे कंत्राटी कर्मचारी यांच्या पगारी थकल्या आहेत ते कधी देणार संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. याशिवाय कुणबी प्रमाणपत्र काढताना वडिलांचे जात पडताळणी झालेली असताना मुलांना नाहक त्रास का दिला जात आहे. त्यांना तात्काळ दाखले मिळावेत अशी ही मागणी केली तर शहरात सीसीटीव्ही कधी बसवणार व कचेरी दत्त मंदीर रस्त्याचे काम याबाबत विचारणा घोलप यांनी केली.
करंजेतील सभागृह चोरीला …
करंजे गावातील सभागृह चोरीला गेल्याची तक्रार यावेळी शशिकांत पवार व शहाजी ठोसर यांच्याकडून करण्यात आली. गावात काही वर्षांपूर्वी सभागृहाचे काम झाले असताना मंदिरापुढे पुन्हा एकदा सभागृह करून त्याचे पैसे लाटण्याचा आरोप यावेळी दोघांकडून करण्यात आला. या संबंधित कामाची चौकशी करावी अशी मागणी यावेळी पवार व ठोसर यांच्याकडून करण्यात आली.
भुमिअभिलेख ..
भूमीअभिलेख कार्यालयात सावळा गोंधळ असून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावीत अशी मागणी आयुब शेख यांनी केली आहे. याशिवाय बदली झालेले अधिकारी त्याच ठिकाणी काम करताना दिसतात लोकांची कामे वेळेवर होत नाहीत यामुळे या ठिकाणी संबंधित कार्यालयाच्या कामकाजावर लक्ष द्यावी अशी मागणी करण्यात आली.
एस टी महामंडळ ..
एसटी महामंडळात बऱ्याच तक्रारी झाल्या तरी आतापर्यंत काम नीटनेटके होताना दिसत नाही. तात्पुरते काम चलाऊ उत्तरे दिली जातात व वेळ मारून नेली जाते. यामुळे संबंधित ठिकाणी देखरेखी साठी एक समिती नेमण्याचे आश्वासन यावेळी आमदार पाटील यांनी दिली. या ठिकाणी सदरची समिती ही स्वच्छता, गाड्यांची देखभाल व पाठपुरावा करण्यासाठी नेमले जाईल असे आश्वासन तहसीलदार ठोकडे यांनीही दिले.
महावितरण …
साडेसात एचपीच्या आतील विद्युत पंपाचे बिल सरकारने माफ केले असताना आजही संबंधित बीले ग्राहकांना दिली जात असल्याची तक्रार उत्तरेश्वर कांबळे यांनी केली. तर अधिकाऱ्यांनी सदरची बीले जुनी असल्याचे सांगितले आहे. तरी सरकारने बिलमाफ करण्याच्या सूचना दिल्याच्या त्या तारखेनंतर सदरची बिले आली असतील तर त्यांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. पण जुनी थकीत बील भरावी लागतील याकडेही लक्ष वेधले.
याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य सवितादेवी राजे भोसले, माजी सभापती शेखर गाडे, गहिनीनाथ ननवरे, संतोष वारे, एडवोकेट राहुल सावंत, शिवसेना नेते शाहू फरतडे, शंभूराजे फडतडे यासह इतर नागरिकांनी प्रश्नांचा भडीमार केला होता. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील तळेकर यांनी केले. तर सचिव म्हणून गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी काम पाहिले. यावेळी व्यासपीठावर सर्व विभाग प्रमुख व पोलीस निरीक्षक रणजीत माने हे उपस्थित होते.