करमाळ्यात धर्मवीर आनंद दिघे फेस्टीवलला नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद ; युवा कलाकारांना संधी
करमाळा प्रतिनिधी
धर्मवीर आनंद दिघे फेस्टिवलच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य भागातील विद्यार्थ्यांना आपल्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम महेश चिवटे यांनी केले असून यामधून नक्कीच राज्यपातळीवरचे व देशपातळीवरचे कलाकार निर्माण होतील असा विश्वास भैरवनाथ शुगरचे आलेगाव चे संचालक पृथ्वीराज भैय्या सावंत यांनी व्यक्त केले.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित तीन दिवसाच्या धर्मवीर आनंद दिघे फेस्टिवल चे उद्घाटन पृथ्वीराज भैय्या सावंत यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी टायगर ग्रुपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, व्यासपीठावर दत्तकला शिक्षण संस्थेचे संचालक रामदास झोळ, बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, सदस्य बिभीषण आवटे, सवितादेवी राजे भोसले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, कारखान्याचे संचालक रमेश कांबळे, डॉ. हरिदास केवारे, उद्योजक पिंटू शेठ गुगळे, ॲड. कमलाकर वीर, सुनील लुनिया, विनोद देवी, महेश् पुजारी, आदिनाथ चे कार्यकारी संचालक हरिदास डांगे, सामाजिक कार्यकर्ते अरुण काका जगताप, नगर सेवक प्रशांत ढाळे, अतुल फंड, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, पंचायत समितीचे सभापती शेखर गाडे, विजयकुमार दोशी पदाधिकारी उपस्थित होते.
पृथ्वीराज सावंत म्हणाले की, ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या पद्धतीने बाळासाहेबांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत आहेत. राज्याचे आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य क्षेत्रात मूलभूत बदल होत आहेत. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आरोग्य सेवा देण्याचे काम सुरू आहे. विशेषता महिलांच्या आरोग्याचे काळजी घेणे आपल्या सर्वांचे जबाबदारी असून महिलांच्या आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी गावोगावी शिबिर घेऊन महिलांमध्ये जनजागृती करावी असे आव्हान त्यांनी केले.

याशिवाय या फेस्टिवलच्या माध्यमातून सलग तीन दिवस विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून मोफत चष्मे वाटप व मोफत औषधांचे वाटप सुरू आहे. याशिवाय ज्या लोकांना ऑपरेशनची गरज आहे अशा लोकांना सुद्धा ऑपरेशन करण्याची सोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून केली जात आहे. या आरोग्य सेवेचा फायदा घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी अहोरात्र कष्ट घ्यावी असे आवाहन पृथ्वीराज सावंत यांनी केले.