आगारात नव्या गाड्या दाखल ; पाच गाड्यांवर करमाळाकरांची बोळवण
करमाळा – विशाल घोलप
चार जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या करमाळा तालुक्यात मागील दोन वर्षांपासून एसटी चा प्रवास अडचणीचा ठरलेला आहे. वेळोवेळी गाड्या बंद पडत असून याचा प्रवाशांसह वाहक व चालकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. त्याच्याच मागणीसाठी मागील वर्षभरापासून नव्या एसटीसह कर्मचारी व साधनसामग्री उपलब्ध करावी अशी मागणी होते. सध्या केवळ पाच गाड्या देत शासनाने करमाळाकरांची केवळ बोळवण केलेली दिसून येत आहे.

धाराशिव, पुणे, अहिल्यानगर तसेच सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमेवर करमाळा तालुका असल्याने या भागात चारही जिल्ह्यातील प्रवासी येजा करीत असतात. या ठिकाणी प्रवासासाठी मुळातच गाड्यांची संख्या अपुरी आहे. तर दुरुस्तीसाठी लागणारे हेल्पर ची संख्या निम्म्यापेक्षा कमी आहे. त्यामध्ये समाधान मानून काम करत राहिले तरी बंद पडणाऱ्या गाड्यांचे स्पेअर पार्ट उपलब्ध होणे कठीण जाते. त्यामुळे गाड्या बस स्थानकाच्या बाहेर पडल्यानंतर बंद पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत.

करमाळा आगाराची अवस्था अत्यंत वाईट असतानाही करमाळा आगाराला केवळ पाच गाड्या देऊन या ठिकाणी कर्मचाऱ्यांसह नागरिक व प्रवाशांची केवळ थट्टा केल्याची दिसून येत आहे. सध्या तरी नागरिक मिळाल्या त्याच्यात समाधानी असले तरी मुळात गरज सुखद प्रवासाची आहे. जुन्या गाड्या असो किंवा नवीन गाड्या त्या रस्त्यावर धावणे गरजेचे आहे. हेल्पर ची संख्या कमी व त्यांना मिळणारे स्पेअर पार्ट नसल्याने अनेकदा गाड्या आजही बंद पडणार आहेत व पुढेही हीच परिस्थिती राहील मग केवळ पाच गाड्यांवर समाधानी राहायचं का हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.
मागील बऱ्याच काळापासून करमाळा आगाराला गाडी मिळाली नसल्याने आलेल्या गाड्याही कमी नाहीत असे समजून सर्वच खुश झालेले दिसून येत आहेत. कार्यकर्त्यांकडून आपापल्या नेत्यांचा गुणगौरव केला जात आहे. पण उर्वरित स्पेअर पार्ट व हेल्पर ची संख्या वाढवण्यासाठी त्याच कार्यकर्त्यांनी आपापल्या नेत्यांपाशी आग्रह धरणे गरजेचे आहे. तर त्या सर्व नेत्यांनी ज्या पद्धतीने गाड्या आणण्यासाठी प्रयत्न केले त्याच पद्धतीने उर्वरित अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सध्या जनतेतून मागणी होत आहे.