महिना उलटला तरी उर्वरित गाड्या भेटेना ; बोळवण चे वृत्त ठरले खरे
करमाळा समाचार

तालुक्यासह जिल्हाभरात प्रत्येक महामंडळ आगारामध्ये दहा बस येणार असल्याबाबत सांगितले जात आहे. तर सुरुवातीला बार्शी, करमाळा, अक्कलकोट या ठिकाणी बस पोहोचल्यानंतर बसचे पूजनही झाले. बार्शी, अक्कलकोट सारख्या ठिकाणी एकाच वेळी दहा बस पोहोचल्या तरी करमाळ्यात मात्र हा आकडा पाच च्या पुढे सरकतांना दिसत नाही. यापूर्वीही करमाळ्याची केवळ पाच गाड्यांवरच बोळवण केल्याबाबत बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. आज अखेर महिना उलटला तरी गाड्या मिळत नसल्याने सदरचे भाकीत खरे ठरू लागले आहे.

सुरुवातीला केवळ पाच गाड्या दिल्यानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तसेच नेत्यांची बोळवण केल्याचे दिसून येत आहे. गाड्या मिळाल्यानंतर तालुक्यातील सर्वच गटातटांसह राजकीय कार्यकर्त्यांकडून दावा करीत नेत्यांची पाठ थोपटली जात होती. परंतु तब्बल महिना उलटला तरी अद्याप गाड्या न आल्याने आजही त्याच अडचणींना करमाळा आगाराला सामोरे जावे लागत आहे. केवळ पाच गाड्या आल्यानंतर बस स्थानक सुरळीत चालेल ही मनाची समाधान करणारी बाब आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर येत आहे. सदरच्या गाड्या बंद पडण्याचे प्रमाण आजही जैसे थे असल्याने प्रवाशांची अडचण होत आहे.
सोमवारी करमाळा – पुणे जाणारी गाडी मध्येच बंद पडल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसले. मुळात सदरची गाडी पाहिली असता ती गाडी तालुक्यातही फिरायच्या योग्यतेची नसल्याचे दिसून येईल. परंतु त्या गाडीला लांब पल्ल्याच्या म्हणजेच स्वारगेट पर्यंत पाठवण्यात आली. सदरची गाडी रात्री अपरात्री बंद पडल्यास याला जबाबदार कोण असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे केवळ पाच गाड्यांवर करमाळा आगाराचा कारभार सगळीच चालणार आहे का ? इतर गाड्या कधी मिळणार हा प्रश्न आहे.

आकरा गाड्यांची वयोमर्यादा संपली …
करमाळा तालुक्याच्या प्रवासी संख्येनुसार करमाळ्यात ७० ते ७५ गाड्या असणे अपेक्षित आहेत. त्याच्या माध्यमातून कमीत कमी सुरळीत फेऱ्या पूर्ण होतील असा अंदाज आहे. पण बिघडलेल्या गाड्या व बाहेर पाठवलेल्या अशा गाड्यांमुळे सदरची संख्या केवळ ५८ वरती येऊन थांबले आहे. वर्षभरात सहा गाड्यांचं कार्यकाल संपल्यामुळे त्या गाड्या स्क्रॅप मध्ये पाठवल्या. तर येणाऱ्या काळात अजूनही पाच ते सहा गाड्या बंद पडणार आहेत. यामुळे एकूण ११ गाड्या बंद अवस्थेत असणार आहेत पण त्याच्या मोबदल्यात करमाळ्याला काय मिळते याकडे लक्ष लागून होते.
तालुक्यासह इतर ठिकाणीही दहा गाड्या देण्याचं नियोजन आहे. पहिल्या फेरीतील पाच गाड्या करमाळ्याला मिळाल्या आहेत. तर दुसऱ्या फेरीतील पाच गाड्या येणे बाकी आहेत. बंद व स्क्रॅप गाड्यांची आकडेवारी वरिष्ठांकडे कळवलेली आहे. नवीन गाड्या मिळणे अपेक्षित असून लवकरच करमाळा आगाराला आणखीन पाच गाड्या मिळतील अशी शक्यता आहे. प्रत्येकच तालुक्यातून मागणी होत असल्याने विभागणी करून गाड्या दिल्या जात असाव्यात असा अंदाज आहे.
– विरेंद्र होनराव, आगार प्रमुख करमाळा.