विरोधकांनी मामा जवळ चुकीचा सल्ला देणारी माणसे पेरली… पाटलांचा शिंदेंना सल्ला
करमाळा समाचार
तालुक्यातील निवडणुकांचा विचार करता संजयमामा शिंदे यांनी राष्ट्रवादीत उभा राहिले असते तर आज निवडून आले असते असे माझेच नाही तर अजितदादांचेही मत असल्याचे पाटील यांनी सांगितले. याशिवाय विरोधकांनीच मामांचा विचार चुकावा म्हणून अशी माणसे त्यांच्याजवळ पेरली की ते मामांचा विचार बदलायला भाग पाडतील व अशा लोकांमुळेच मामांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मामांनी अशी कोण लोक त्यावेळी जवळ होते याची चाचपणी केली पाहिजे असा सल्ला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी मामांना दिला. ते आढावा बैठकी निमित्ताने करमाळ्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.

विधानसभेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट पडलेले असतानाही तालुक्यातून राष्ट्रवादीला पसंती मिळत होती. परंतु राष्ट्रवादी व भाजपा शिवसेना एकत्र असल्याने जरांगे फॅक्टरमुळे मराठा मतांचा फटका बसू नये म्हणून संजयमामांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला होता असे बोलले गेले. मुळातच संपूर्ण पाच वर्षाच्या कालावधीत संजयमामा राष्ट्रवादी मधून कोणतीही निवडणूक लढवलेले नाहीत किंवा उघडपणे राष्ट्रवादीत असल्याचं जाहीरही केलं नाही. केवळ आपले नेते अजितदादा असल्याचे त्यांनी सांगितले होते.

एकीकडे लोकसभेच्या विजय पराभवा बाबत बोलत असताना राजकारणात जो काम करेल त्याला लोक निवडून देतील असे सांगणारे उमेश पाटील मात्र करमाळ्याचे गणित मांडत असताना पक्षाचे पद नाकारल्याने पराभव झाल्याचे सांगत संजयमामांना सल्ला देऊन गेले. वास्तविक पाहता त्यांचा सल्ला सध्याची राजकीय परिस्थिती पाहता योग्य मानला जाऊ शकतो. कारण गेल्या निवडणुकीत संजयमामा यांना राष्ट्रवादीची साथ मिळाली होती. याशिवाय उमेदवार नसतानाही विरोधकांना राष्ट्रवादीचा फायदा न झाल्यामुळे अपक्ष असताना शिंदे हे आमदार म्हणून निवडून आले होते. हेच मुळात २०२४ मध्ये अंगलट आले. याठिकाणी २०१९ च्या तुलनेत मामाकडुन राष्ट्रवादी पदाधिकारी वगळता मतदारांनी पक्षासोबत जाणे पसंत केले व नारायण पाटील यांना साथ मिळाली.