शिवजयंती साजरी करण्याबाबत शासनाने लादलेल्या जाचक अटी रद्द करा ; मुस्लिम नेत्याची मागणी
करमाळा समाचार
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या जाचक अटी लावलेल्या आहेत त्या त्वरित रद्द करून शिवप्रेमीना शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे ईमेल द्वारे केली आहे.

यावेळी तांबोळी यांनी पाठविलेल्या ईमेल निवेदनात मध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने कोवीड मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी होणारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साध्या पध्दतीने साजरी करण्यात यावी अशा आशयाचे परिपत्रक काढले आहे.
यामध्ये शिवजयंती साजरी करण्याबाबत अनेक प्रकारचे जाचक अटी व निर्बंध लावलेल्या आहेत. परंतु आता राज्यात कोरोना महामारी चे प्रमाण अत्यल्प प्रमाणात आहे आणि महाराष्ट्र शासनाने अनेक बाबतीत शाळा, रेल्वे, एसटी बस, हाॅटेल व्यवसाय सुरू करण्यास यापूर्वी परवानगी दिलेली आहे. तसेच निवडणूका घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शासनाने महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमीच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव साजरी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ज्या जाचक अटी लावलेल्या आहेत त्या त्वरित रद्द करून परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.
