शेतकरी आत्महत्येला आठ वर्ष सरले सरकारकडुन दिलेले आश्वासन हवेतच विरले
करमाळा समाचार – विशालनाना घोलप

“स्वतःचे तसेच कर्जबाजारी मित्रांची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत माझे अंत्यसंस्कार करू नका” म्हणत शेतकऱ्याने आत्महत्या केलेल्या दिवसाला आज तब्बल आठ वर्षे पूर्ण झाली. याशिवाय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दिलेलं आश्वासनही हवेतच जिरून गेलं. सरकारच्या भरोशावर बसले असते तर आतापर्यंत होतं तेवढं संपून गेलं असतं. पण मुलांची माय पुढे आली व तिने संसार सावरला. आज संपूर्ण कुटुंब सरकारच्या भरोशावर न राहता स्वबळावर पायावर उभा राहिला आहे. पण प्रश्न उरतो तो सरकारने दिलेल्या आश्वासनाचे काय झाले.

वीट ता. करमाळा येथील धनाजी चंद्रकांत जाधव (वय ४२) यांनी दि.७ जून २०१७ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती व सोबत एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करीत “माझे व माझ्या मित्रांचे कर्ज फिटत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करू नका तसेच मुख्यमंत्री येतील त्यावेळीच माझ्या चितेला अग्नी द्या. माझ्या मुलांची काळजी घ्या” असे लिहून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती.
दुसऱ्या दिवशी संतप्त शेतकऱ्यांनी तसेच वीट ग्रामस्थांनी अहमदनगर – टेंभुर्णी महामार्ग मौलाली माळ येथे रोखला व मुख्यमंत्र्यांवरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी लावून धरली. यावेळी तत्कालीन पालकमंत्री देशमुख, तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, दिग्विजय बागल व राजू पाटील यांनी शेतकऱ्यांचा समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान विजयकुमार देशमुख यांनी शेतकऱ्यांची मुख्यमंत्री फडवणीस यांच्याशी चर्चा घडवून दिली. यावेळी झालेल्या संभाषणामध्ये कुटुंबीयांना आर्थिक मदत, दोन्ही मुलांचा शिक्षणाचा खर्च व त्यांच्या नोकरीचे जबाबदारी घेण्याचे आश्वासन सरकारमार्फत देण्यात आले होते. त्यानंतर जाधव यांचा मृतदेह ताब्यात घेऊन वीट येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आश्वासनाचा विसर …
सदरच्या आश्वासनानंतर सरकारकडून आर्थिक मदत म्हणून तहसीलदार यांनी एक लाख रुपये तर जिल्हाधिकारी यांच्याकडून एक लाख असे दोन लाख रुपयांची मदत जाधव कुटुंबीयांना करण्यात आली होती. त्यानंतर जाधव कुटुंबीयांचे मुलांचे शिक्षण पूर्ण झाले तरीही सरकारने मात्र त्यांच्याकडे पुढील दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाहीत. दरम्यानच्या काळात धनाजी जाधव यांच्या कुटुंबातील त्यांच्या पत्नी व मुलांनी स्वबळावर शेती व व्यवसाय केला त्यातून ते सावरले. परंतु सरकारने अद्यापही नोकरीचे वचन पाळलेले नाही.
इतरांकडुन मदत ..
आठ वर्षांपूर्वी ज्यावेळी धनाजी जाधव यांनी आत्महत्या केली. त्यावेळी जाधव कुटुंबियाकडे दोन एकर शेती होती. या शेतीमध्ये काम करीत रोहिणी जाधव यांनी आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करायचे ठरवले. दरम्यान आत्महत्या नंतर शिवसेना नेते तानाजी सावंत, शेतकरी संघटनेचे संजय घाटणेकर, अतुल खूपसे व वीट येथील ग्रामस्थ तेजस ढेरे यांनी मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. यातून मुलांनी शिक्षण पूर्ण केले. त्यामध्ये योगीराज याने बीकॉम तर युवराज यांनी बारावी शिक्षण उत्तीर्ण केले आहे.
मदतीशिवाय सावरले …
सरकारने नोकरीचे आश्वासन दिल्यानंतर शिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर जाधव कुटुंबीयांनी शिक्षणासाठी विनंती केल्या, शासनाचे उंबरटे झिजवले. परंतु त्यांच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. अखेर त्यांनी स्वबळावर व्यवसाय व शेती करीत आज स्वतः व्यावसायिक म्हणून नावारूपाला आलेले आहेत. त्यामुळे पतीच्या निधनाचे दुःख करीत न बसता पत्नी रोहिणी हिने मुलांच्या मदतीने कुटुंब सावरले. मुले आज खासगी व्यवसायातून उत्तमरीत्या स्थिरावलेले दिसून येत आहेत.