संघर्षमय आयुष्यात कष्टाला आले फळ ; शेतीतील अविष्काराने देशभरात गाजावाजा
करमाळा – विशाल घोलप
कोणत्याही प्रकारचे यांत्रिक शिक्षण नसताना व विविध धंद्यांमध्ये नुकसान पदरी पडल्यानंतरही नवा प्रयोग करून स्वतःसह शेतकऱ्यांचे काम सोपे करणाऱ्या शेतकऱ्याला शासनानेही सन्मानित केले आहे. शासनाच्या वतीने करमाळा तालुक्यातील वीट येथील शेतकरी व हरिहर ऍग्रोचे संस्थापक रणजीत निंबाळकर यांचा आंतरराष्ट्रीय कृषी हेकेथॉन स्पर्धेत दुसरा क्रमांक आला आहे. तर या निमित्ताने शासनाच्या वतीने केंद्रिय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते पंधरा लाख रुपयांचे बक्षीस व पारितोषिक देण्यात आले आहे. मानव चलीत, पावर टिलर व टॅक्टर चलित टोकन पेरणी यंत्र तयार करुन त्याचे पेटंट निंबाळकर यांनी मिळवले आहे.

शेती मध्ये आज अनेक अनेक नवनवीन बदल होत आहेत. अनेक औजारे ह्या मनुष्यबळाच्या अभावी गरज बनली आहेत. तसेच यामुळे कमी वेळात अचूक व परिणामकारक अनेक वस्तू शेतीसाठी आवश्यक गरज बनल्या आहेत. यापैकी एक गरज म्हणजे म्हणजे पेरणी करणे, आज अनेक जणांना पशुधन परवडत नाही व छोट्या शेतकऱ्याला इतर पर्याय खर्चिक झाले आहेत. तसेच आपल्या वेळेत उपलब्ध होत नाहीत. तसेच अनेक प्रकारच्या लागवडी ह्या खर्चिक व वेळेत मनुष्य बळ न मिळाल्यास नुकसान सहन करावे लागते यासाठी मानवचलीत पेरणी यंत्र, एक यंत्र जे की अनेक गरजा पूर्ण करते असे तयार करण्यात आले आणि हे यंत्र वीट येथील रणजीत निंबाळकर यांनी निर्माण केले असुन इतर महागड्या यंत्रापेक्षा स्वस्तही आहे.

रणजीत निंबाळकर यांचे शिक्षण कलेच्या माध्यमातून झाले होते. ते पुणे येथे कार्यरत होते. त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान व्यावसाय बंद करून ते पुन्हा आपल्या मूळ गावी वीट येथे येऊन शेती करू लागले. दरम्यानच्या काळात त्यांनी गावी वीट येथे मातीच्या वीटांचा कारखाना सुरू केला. त्यामध्ये यांचे नुकसान झाले. त्यानंतर त्यांनी दुग्ध व्यवसायात प्रवेश केला. त्यातही त्यांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागेल. दरम्यानच्या काळात त्यांनी शेतीकडे लक्ष देण्याचे ठरवले व शेतीत काम करत असताना त्यांनी स्वतःच काम सोपे होण्यासाठी सदरचे यंत्र निर्माण केले. त्यानी डिजाईन स्वतः तयार केले व गावातून सहज उपलब्ध होणाऱ्या वस्तूंपासून हे यंत्र तयार करून वापरले तेव्हा हे फायदेशीर असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी याचे पेटंट मिळवले. त्यानंतर या यंत्राची निर्मिती केली. सदरचे यंत्र हे एक फनापासून ते बारा फणा पर्यंत वापरले जाऊ शकते. याशिवाय यामध्ये अधिकचा खर्च नसून मशीनही स्वस्त मिळते. यामुळे याकडे लोकांची मागणी ही वाढलेली आहे. सदरची निर्मिती पाहून शासनाने त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस दिले आहे. नुकताच पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात पंधरा लाख रुपयांचे बक्षीस व पारितोषिक देण्यात आले.
सर्व पिकांची पेरणी …
यंत्र १ ते १२ फनामध्ये उपलब्ध आहे. एकूण अंतर ४२ इंच म्हणजे साडेतीन फूट आहे. दोन ओळीतील अंतर पाहिजे तेवढे ठेवता येते. पर्यायाने वेळ, पैसे, श्रम वाचून अतिशय गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळते. सर्व प्रकारची भाजीपाला बियाणे, कांदा, धने (कोथिंबीर) , तीळ , काऱ्हाळ , मुळा , कोबी, गाजर , बीट, धने , मेथी , मिरची, भेंडी, गवार, टोमॅटो यासारखी व इतर अनेक बियाणे यशस्वी रित्या पेरता येतात. मशीन मुळे दोन ओळीतील अंतर हे कमीत कमी ४ इंचा पासून पुढे ६० इंचापर्यंत करता येते.
दोन बियातील अंतर १.५ इंचापासून ४८ इंचापर्यंत करता येते.
केंद्रिय कृषीमंत्री चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार …
पुणे या ठिकाणी भरलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी हेकेथॉन यामध्ये कृषी मशिनायझेशन या विभागामध्ये हरिहर ऍग्रो यांनी भाग घेतला होता. यामध्ये ५६० स्पर्धकांमधून १४० स्पर्धक फायनल राऊंड साठी निवडले गेले होते. त्याच्यामध्ये हरिहर ऍग्रो यांनी बनवलेल्या आधुनिक विना गिअर विना न्यूमॅटिक (व्हॅक्युम) टेक्नॉलॉजीच्या मानव, पावर टिलर व ट्रॅक्टर चलित पेरणी टोकन यंत्रला दुसऱ्या क्रमांकाने १५ लाखाचे बक्षीस व प्रशस्तीपत्र मिळालेले आहे, हे बक्षीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते देण्यात आले.