कर्तव्यात कसुर तत्कालीन तहसिलदारांना पाचशे रुपये शास्ती ; जिल्हाधिकाऱ्यांना आढाव्याबाबत सुचना
करमाळा समाचार
शिधापत्रिकेतील नाव कमी करण्यासाठी तीन दिवसांची कालमर्यादा ठरवलेली असताना सदर कामासाठी १५३ दिवसांनी विलंब केला. यामुळे सेवा हमी कायद्यात कसुर केल्यामुळे तत्कालीन तहसीलदार विजयकुमार जाधव यांना ५०० रुपयांची शास्ती करण्यात आली आहे. सदरचे प्रकरण १६ नोव्हेंबर २०२३ रोजी करमाळा तहसील मध्ये आले होते.

करमाळा तालुक्यातील सौंदे येथील अप्पासाहेब बाबुराव गायकवाड यांनी तहसिलदार करमाळा यांचेकडे सेवा हक्क कायदा २०१५ अन्वये दिनांक १६ नोव्हेंबर २०२३ रोजी शिधापत्रिकेतील नाव कमी करणे या अधिसूचित सेवेबाबत अर्ज दाखल केला होता. सदर सेवा अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने अधिसूचित केलेली असून सेवा देण्यासाठी विहित कालमर्यादा ३ कार्यालयीन दिवसांची आहे. अपिलार्थी यांनी मागणी केलेली सेवा तृतीय अपिलातील सुनावणीची नोटीस प्राप्त झाल्यानंतर म्हणजेच १५३ दिवस विलंबाने दिलेली आहे.

आदेशान्वये सेवा हमी कायद्यानुसार विजयकुमार जाधव, तत्कालिन तहसिलदार तथा पदनिर्देशित अधिकारी यांनी त्यांच्या निहित कर्तव्यात कसूर केली असल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम २०१५ कलम १८ (२) अन्वये रु.५००/- एवढी शास्ती लादण्यात आली आहे.
याशिवाय संदर्भिय आदेशान्वये सेवा हमी कायद्याअंतर्गत प्राप्त होणा-या अर्ज अपिलांबाबत वेळोवेळी आढावा घ्यावा तसेच अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना लोकसेवा हक्क अधिनियमाबाबत प्रशिक्षण देऊन त्यानुसार कामकाज करण्यात येईल याची दक्षता घ्यावी अशा सुचाना सदर आदेशामध्ये जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात नमूद केल्या आहेत.