तलाठी खुन प्रकरणाचे पडसाद करमाळ्यात ; सखोल चौकशीची मागणी
करमाळा
मौजे आडगांव रंजे, ता. वसमत, जि. हिंगोली येथे भरदिवसा तलाठी कार्यालयात तलाठी संतोष देवराव पवार यांचा शासकीय कामकाज करत असतांना चाकू भोसकुन खुन करण्यात आला. महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचा-यासोबत खुनाची घटना घडल्याचा प्रकार अत्यंत भ्याड, निंदणीय व घृणास्पद असून यामध्ये आरोपीची मानसिक विकृती दिसुन येते. या घटनेचा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने अत्यंत तीव्र, संवेदनशील व दुःखद भावनेने निषेध व्यक्त करीत निवेदन दिले आहे.
निवेदनात लिहले आहे की, वास्तविक “फेरफार प्रलंबित असल्याने खून” अशा प्रकारच्या बातम्या पसरविल्या जात आहे. मात्र संबंधित व्यक्तीचे कोणत्याही प्रकारचे फेरफार प्रकरण तलाठी यांचेकडे प्रलंबित नव्हते. केवळ आपल्या कुटुंबातील शेतजमीन नातेवाईक कुणालातरी हाताशी धरुन परस्पर त्यांच्या नावावर करुन घेतील काय? अशा संशयावरुन आरोपीने मयत दुदैवी तलाठी संतोष देवराव पवार यांचा खुन केल्याचे मिळालेल्या माहितीवरुन कळते. परंतु चुकीच्या बातम्या पसरविल्याने यामध्ये विनाकारक तलाठी संवर्गाला बदनाम केले जात आहे ही बाब अन्यायकारक आहे. यामधील खुलासा आपल्या स्तरावरुन सुध्दा व्हावा, हे अपेक्षित आहे.
या घटनेमुळे मयत तलाठी संतोष देवराव पवार यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले असुन केवळ संशयामुळे; त्यांचा कोणताही दोष नसतांना आरोपीच्या मानसिकतेमुळेच त्यांना जीव गमवावा लागला. या घटनेमुळे राज्यातील तलाठीच नव्हे तर संपुर्ण सरकारी कर्मचारी यांचे खच्चीकरण झाले असुन कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
१) राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी हे घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन उद्या “एक दिवसीय लक्षवेधी काम बंद आंदोलन पुकारत आहे.
२) आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडुन प्रयत्न व्हावेत तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवुन व तज्ञ / जेष्ठ सरकारी विधिज्ञामार्फत कायद्यानुसार कमाल शिक्षा देण्यांत यावी, यासाठी शासनाकडुन प्रयत्न व्हावेत.
३) मयत तलाठी यांच्या पश्चात पत्नी, २ लहान मुले, आई, वडील, २ भाऊ व
बहीण असा परिवार असुन पैकी मयत तलाठी हे सर्वात मोठे व कर्त असल्याने त्यांच्या कुटुंबियास किमान ५० लाख रुपयांची विशेष तात्काळ मदत शासनाने त्वरीत जाहीर करावी.
४) भविष्यात त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या वारसांना
अनुकंपाद्वारे तात्काळ शासकीय सेवेत समाविष्ट करुन घ्यावे. ५) राज्यात कलम ३५३ अजामिनपात्र गुन्हा हा जामिनपात्र करण्यांत आला
आहे. या सारख्या घटना घडु नयेत व सरकारी कर्मचाऱ्यांवर वारंवार होणारे हल्ले होवू नयेत यासाठी कायद्यात दुरुस्ती करुन कलम ३५३ हे
अजामिनपात्र करण्यात यावे, एवढेच नव्हे तर या सारखे इतर काही कायदे अस्तित्वात आणून कर्मचाऱ्यांना सुरक्षा देण्याबाबत गांभीर्याने विचार व्हावा व संरक्षण मिळावे.
वरील प्रमाणे बाबी आपल्या निदर्शनास आणून देत असून राज्यातील तलाठीच नव्हे तर संपूर्ण सरकारी कर्मचाऱ्यांच्या भावना विचारात घेवून योग्य ते संरक्षण देण्याचा प्रयत्न व्हावा व पुन्हा अशा घटना होवु नये म्हणून सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवुन आरोपीस अत्यंत कठोर शिक्षा देण्यात यावी, ही नम्र विनंती करण्यात आली आहे.
अध्यक्ष संजय शेटे करमाळा तालुका तलाठी संघ, उपाध्यक्ष साईनाथ आडगटाळे, सरचिटणीस परमेश्वर सलगर व सर्व तलाठी तसेच तलाठी संवर्गातील मंडळ अधिकारी यांनी तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना काम बंद चे निवेदन दिले.