आता सहा तास वीजेसाठी शेतकऱ्यांनीही पक्षात प्रवेश करावा का? ; शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
करमाळा समाचार | विशेष बातमी

“पक्षात प्रवेश केला तरच वीज?” – करमाळ्यातील शेतकऱ्यांमध्ये संतप्त चर्चा “कोणत्याही चौकशा लागू नयेत, जेलमध्ये जाऊ नये किंवा निधी मिळावा म्हणून अनेकजण सत्ताधारी पक्षात प्रवेश करत असल्याच्या चर्चा आपण अनेकदा ऐकल्या आणि पाहिल्या आहेत. आता अशीच वेळ शेतकऱ्यांवर तर आली नाही ना?” असा सवाल करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत आहे.

परिसरातील इतर तालुक्यांना कृषी पंपांसाठी सुमारे सहा तास वीजपुरवठा होत असल्याचा दावा केला जात असताना, करमाळा तालुक्यात मात्र कमी कालावधीचा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे “आम्हालाही पुरेसा वीजपुरवठा मिळण्यासाठी एखाद्या पक्षात प्रवेश करावा लागेल का?” असा उपरोधिक प्रश्न अनेक शेतकरी उपस्थित करत आहेत.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, वीजपुरवठ्याबाबत सर्व तालुक्यांना समान न्याय मिळायला हवा. शेतीचे नियोजन, पिकांचे सिंचन आणि उत्पादन यासाठी नियमित व पुरेसा वीजपुरवठा अत्यावश्यक आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यावर होत असल्याचा आरोप असलेला हा अन्याय तातडीने दूर करून इतर तालुक्यांप्रमाणेच पुरेसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

दरम्यान, संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

