रिटेवाडी संघर्ष समीतीच्या म्होरक्याचे दुख:द निधन
करमाळा समाचार –
मागील बऱ्याच वेळा वर्षापासून चर्चेत असलेल्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी नव्याने आंदोलन पेटवणारे व आंदोलनाचे म्होरके असलेले अंजनडोह माजी उपसरपंच शहाजी दगडू माने यांचं नुकताच निधन झालं आहे. मंगळवार दिनांक 15 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर येऊन पडले व त्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर उपचारापूर्वी मयत झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यांच्या अकाली निधनाने चळवळीतला नेता हरपल्याची भावना सुभाषचंद बलदोटा यांनी व्यक्त केली.

शहाजी दगडु माने रा. अंजनडोह ता. करमाळा यांनी रेटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी पुन्हा एकदा संघटन तयार करून त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विविध नेत्यांची उंबरे झिजवली. यावेळी त्यांच्यासोबत परिसरातील 30 ते 40 गावातील इतरही सहभागी झाले होते. त्यांच्या या प्रयत्नाला काही प्रमाणात श्रेयशही आले होते. पण संपूर्ण यश येण्यापूर्वीच त्यांचं अचानक निधन झाल्याने चळवळीत काम करणाऱ्या तसेच रिटेवाडी उपसा सिंचन व इतर आंदोलनाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

सुरुवातीला बागल गटाच्या माध्यमातून राजकीय काम करत असतानाही जेव्हा बागल गटाकडून मकाई चे पैसे थकले त्यावेळी त्यांच्याविरोधात ठामपणे भूमिका घेणारा एक लढवय्या आमच्यातून आज निघून गेला याचं मोठ्या प्रमाणावर दुःख वाटत आहे. भीम दल संघटने कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
– सुनिल भोसले, जिल्हाध्यक्ष भीमदल