मकाईचा निकाल लागला – मागील चार दिवसापासुन लागलेली उत्सुकता संपली
करमाळा समाचार
मकाई सहकारी साखर कारखान्यावर ज्या हरकती घेण्यात आल्या होत्या. त्या हरकतींचा आज सोलापूर येथे निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्या निकालावर कोणतेही बदल झालेले दिसून येत नसून पहिला अपात्र ठरवण्यात आलेला निर्णय पुढे ठेवल्याची माहिती मिळत आहे. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लवकरच हे प्रसिद्ध केले जाईल अशी माहिती आहे. त्यामुळे ज्या लोकांनी तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यांच्यावर पुढील न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता शेतकरी कामगार विकास पॅनल चे कुणाल पाटील व सहकाऱ्यांनी यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

या अपात्र उमेदवारांच्या हरकतींवर सोलापूर येथे सुनावणी पूर्ण झाली होती. त्यावर विरोधी गटातील किती जणांचे अर्ज मान्य केले जातील किंवा मान्य केले जाणार नाहीत यावर निवडणूक कोणत्या दिशेने जाईल याबाबत उत्सुकता होती. पण आता ती उत्सुकता संपली आहे. तत्पूर्वी उमेदवाराने माघार घेतल्यामुळे चिखलठाण, सहकारी संस्था, भटक्या विमुक्त जाती जमाती, इतर मागासवर्ग व अनुसूचित जाती जमाती या गटातील उमेदवारांना विरोधक राहिला नसल्याने यांचा अविरोध मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे.

चिखलठाण गटातून सतीश निळ व दिनकर सरडे, सहकारी संस्था गटातून नवनाथ बागल, भटक्या विमुक्त जाती जमाती मधून बापू चोरमले, इतर मागास अनिल अनारसे व अनुसूचित जाती जमाती मधून आशिष गायकवाड आदि उमेदवार यांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. तर भिलारवाडीत दोन जागांसाठी सहा अर्ज , पारेवाडी तीन जागांसाठी चार अर्ज, वांगी दोन जागांसाठी तीन अर्ज, मांगी दोन जागांसाठी तीन अर्ज, महिला राखीव जागेसाठी दोन जागांसाठी तीन अर्ज बाकी आहेत
भिलारवाडी मंगल हाके, पारेवाडी नितीन पांढरे, हनुमंत निकत, स्वाती पाटील, चिखलठाण निर्मला इंगळे, आप्पासाहेब सरडे, वांगी तुकाराम पिसाळ, मनीषा दौंड, मांगी रोहित भांडवलकर, रवींद्र लावंड, हरिश्चंद्र झिंजाडे, भटक्या विमुक्त जाती जमाती राजश्री चोरमले, महिला राखीव शांता झोळ, अनुसूचित जाती जमाती सुषमा गायकवाड आदि १४ उमेदवारांनी माघार घेतली आहे.