उजनीने ओलांडली पन्नाशी; लवकरच शंभरी गाठणार
करमाळा समाचार – संजय साखरे

सोलापूर ,पुणे व नगर जिल्ह्यातील तीस लाख लोकसंख्या, दोन लाख पशुधन, किमान 50 साखर कारखाने, 25 औद्योगिक वसाहती आणि जलसिंचन योजना ,पिण्याच्या पाण्याच्या पाणीपुरवठा करणाऱ्या योजना यासाठी वरदान असलेले उजनी धरण आज सकाळी 50 टक्के पेक्षा जास्त भरले असून आज सकाळी सहाच्या माहितीनुसार उजनी आज 51.50% एवढे भरले आहे.

आजमितीला धरणात एकूण पाणीसाठा 91.25 टीएमसी झाला असून उपयुक्त पाणीसाठा 27.59 टीएमसी एवढा झाला आहे. तर उजनी धरणात दौंड मधून येणारा विसर्ग कमी झाला असून तो आता 20852 क्यूसेक एवढा आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उजनी धरणात लवकर पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. भीमा नदीच्या खोऱ्यात सातत्याने कमी जास्त प्रमाणात पावसाची संततदार चालू असून दौंड मधून येणारा विसर्ग कमी – जास्त होत आहे.
दरम्यान 50 टक्के भरलेले उजनी धरण लवकर 100% भरण्याची अशा शेतकऱ्यांना आहे. उजनी धरण 100% भरल्यानंतर धरणात 117 टीएमसी पाणी साठा जमा होते. तर धरण 111 टक्के भरल्यानंतर 123 टीएमसी इतका पाणीसाठा जमा होतो. धरणातील 63.65 टीएमसी पाणीसाठा मृत तर 53.34 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त समजला जातो.
मात्र उजनी धरण 100% भरल्यानंतर तरी यावर्षी पाण्याचे योग्य नियोजन होण्याची गरज असल्याची अपेक्षा धरणग्रस्त शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
