आंदोलन सुरुच ठेवल्याने आंदोलकांपुढे प्रशासन नमले ; आश्वासनानंतर आंदोलन स्थगीत
प्रतिनिधी – टेंभुर्णी
उजनी जलाशयातील पाच टी.एम.सी. पाणी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळविलेचा आरोप करीत त्याच्या निषेधार्थ उजनी पाणी बचाव संघर्ष समितीने आज उजनी जलाशयात जलसमाधी आंदोलन पुकारले होते. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू असलेले हे आंदोलन पोलिसांच्या झटापटी नंतर ही थांबले नाही. मात्र शेवटी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी दिनांक ७ मे रोजी नियोजन भवन सोलापूर येथे बैठक लावू असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलनाला स्थगिती दिली व आपल्या आंदोलनाला तुर्तास यश आल्याची भावना समितीच्या सदस्यांनी बोलून दाखविली.


उजनी जलाशय परिसर येथे आंदोलन होणार म्हणून टेंभुर्णी पोलिसांनी उजनी गावात कडेकोट बंदोबस्त लावला होता. सकाळी 9:30 वाजताच शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांनी उजनी जलाशयांमध्ये तळ ठोकून आंदोलनाला सुरुवात केली. सुमारे दोन तास ते उजनीच्या मधोमध जाऊन पालकमंत्र्यांचा निषेध करीत राहिले.
तर इकडे पोलिसांना चकवा देत शेतकरी नेते अतुल खूपसे पाटील, जनहित चे प्रभाकर देशमुख, भाजपाचे माऊली हळणवर, बळीराजाचे माऊली जवळेकर, जिल्हाउपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, मंगळवेढा 35 गाव पाणी संघर्ष समितीचे ॲड. बापू मेटकरी, नारायण गायकवाड, विठ्ठल मस्के, किरण भांगे, प्रहारचे यांच्यासह कार्यकर्त्यांनी उजनी जलाशयात उड्या मारल्या व उजनीमध्ये तळ ठोकून राहिले.
दरम्यान आंदोलन आटोपते घ्या असे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी वारंवार विनंती करून देखील आंदोलन करते ऐकत नसल्याचे पाहून पोलिसांचा बंदोबस्त आणखीनच तगडा करत काही पोलिस पाण्यामध्ये उतरले व आंदोलनकर्त्यांना अटक करण्याच्या तयारीत असतानाच पोलीस व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये मोठी झटापट झाली व थोडी बाचाबाची देखील झाली.
दरम्यान आम्हाला कोणालाही निवेदन द्यायचं नाही निवेदनाचा काय होतं हे आम्हाला माहित आहे त्यामुळे पालकमंत्री दत्तात्रय भरणे जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक लावा आणि तसे लेखी पत्र आम्हाला द्या तरच आम्ही पाण्यातून बाहेर निघू अन्यथा कोणत्याही परिस्थितीत आणि कसल्याही किमतीवर आम्ही पाण्याच्या बाहेर निघणार नाही असा पवित्रा उजनी पाणी बचाव संघर्ष समितीने घेतला.