दोन महिण्यात दुपटीने परताव्याचे अमीष ; चौघांना सहा लाखांचा गंडा
करमाळा समाचार
दोन महिन्यात दुप्पट परतावा देण्याचे सांगून करमाळा तालुक्यातील चौघांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार 24 मार्च रोजी उघडकीस आला आहे. या प्रकरणात तालुक्यातील चौघांकडून प्रत्येकी दीड लाख असे एकूण सहा लाख रुपये घेतल्याचे दिसून आले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या फसवेगिरी करणाऱ्या लोकांपासून सावध राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

तक्रारदार श्री बागल व सहकारी हे कामानिमित्ताने करमाळा शहरालगत असलेल्या कमलाभवानी साखर कारखान्यावर गेले होते. या ठिकाणी त्यांची आंध्रप्रदेश मधून आलेल्या दोन अधिकाऱ्यांसोबत ओळख झाली. त्यावेळी ते निघून गेले परंतु पुढच्या आठवड्यात श्रीनिवास मिंडा व त्यांच्यासोबत बलविंदरसिंह जनरेल असे दोघे आले. यावेळी बागल यांच्यासह इतर तिघे तेथे हजर होते.

बलविंदर सिंह यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना दरमहा साधारण शंभर टक्के परतावा देत असतो असे सांगितले. त्यावेळी तारण म्हणून आमच्या खात्याचा गुंतवणूकदाराच्या रकमांचा दुप्पट रकमेचा चेक हमी म्हणून देत असतो असे सांगितले. त्यावेळी सर्व जणांनी प्रति दीड लाख रुपये प्रमाणे सहा लाख रुपये जनरल सिंह यांच्याकडे दिले. यावेळी त्यांना बारा लाख रुपयाचा चेकही देण्यात आला. परंतु त्यानंतर संबंधितांचा संपर्क केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. यातून फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यावरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहे.