खाजगी जागेतील होर्डींग जमिनदोस्त तर बायपास येथील अर्धवट कामामुळे धोका
करमाळा समाचार
अहमदनगर टेंभुर्णी महामार्गाचे काम करीत असताना आतापर्यंत केवळ जातेगाव अहमदनगर मार्ग पूर्ण झाला आहे. तर अद्यापही टेंभुर्णी जातेगाव हा मार्ग अपूर्णच आहे. अशा परिस्थितीत करमाळा देवीचामाळ रस्त्यावर असलेल्या एका अर्धवट पुलामुळे वाहतुकीला अडथळा तर होतोच शिवाय त्यावर असलेल्या लोखंडी साहित्यामुळे अपघात घडू शकतो. त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तर काल झालेल्या पावसात परिसरातील होर्डींग जमिनदोस्त झाले आहेत यामुळे इतर कोणाचे नुकसान झाले नाही.


शहरातील देवीचामाळ मंदिराकडे जाण्यासाठी असलेल्या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. तर करमाळा शहरापासून बाह्यरस्ता असल्यामुळे परराज्यातील ही वाहने या रस्त्यावरून जात असतात. या अनुषंगाने सदरचा रस्ता पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी पुलाची सोय करण्यात आली होती. त्याचं नियोजन सुरू असल्यामुळे ज्यावेळी काम सुरू झाले त्यावेळी या रस्त्यावर पुलाचे काम केले.
यावेळी केवळ मुख्य चौकातील ढाच्या उभा करीत असतानाच काम बंद पडले. ते आज तागायत काम बंद आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना समोरून येणारे लोक दिसत नाहीत. तर ज्यांना देवीचामाळ किंवा करमाळा शहराकडे जायचं आहे त्यांना रस्ता ओलांडताना मोठ्या वाहनांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत मध्येच उभा असलेल्या ढाच्यावर अद्यापही लोखंडी साहित्य व प्लाऊड जैसे थे असल्याने ते केव्हाही कोसळू शकते अशी भीती परिसरातील नागरिकांना वाटत आहे.
यासंदर्भात वारंवार संबंधित विभागासाठी संपर्क केला. पण ते काढण्यात आले नाहीत. बऱ्यापैकी त्यावरील सामान चोरीलाही गेले आहे. त्यामुळे प्लाऊड असेल किंवा लोखंडी वस्तू असतील ते कधीही खाली कोसळू शकते. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर ते पडले तर मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. वेळीच ते काढणे गरजेचे आहे. सध्या वादळी वाऱ्यासह पावसाचे दिवस आहेत अशा परिस्थितीत मोठा अपघात होऊन लोकांच्या जीवीताला धोका उद्भवू शकतो.
सध्या सदरच्या रस्त्याचे काम हे केंद्राकडे देण्यात आले आहे. तरी याबाबत त्या कार्यालयाला याबाबत सूचना देण्यात येतील. याशिवाय करमाळा येथील स्थानिक कार्यालयालाही याबाबत कळवले जाईल.
– सुनिता पाटील, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलुज.