शेती पंपाचा वीजपुरवठा सुरळीत करा – पाटील
करमाळा- संजय साखरे
महावितरण कंपनीने करमाळा तालुक्यातील उजनी बॅकवॉटर पट्ट्यातील शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित केला असून तो पूर्ववत करावा अशी मागणी करमाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री लक्ष्मीकांत पाटील यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की ,सध्या परिसरातील साखर कारखाने चालू झाले असून उजनी बॅक वॉटर पट्ट्यांमध्ये जागोजागी ऊसतोड मजुरांच्या वस्त्या पडल्या आहेत. त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. याशिवाय शेतकऱ्यांनी जनावरांसाठी केलेल्या मका, घास,कडवळ यासारख्या पिकांना पाणी देणे गरजेचे झाले आहे.

अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच, सध्या शेतकऱ्याकडे वीज बिल भरण्यास कसलाच पैसाच शिल्लक नाही. उसाची रानें आता वापस्या वर आली असून त्यांना खते टाकण्याची पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने ताबडतोब वीज पुरवठा चालू करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
या निवेदनाच्या प्रती त्यांनी माननीय जिल्हाधिकारी सोलापूर, आमदार संजय मामा शिंदे, व सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना पाठवल्याआहेत.