तात्पुरता दिलासा आहे निकाल अजून बाकी आहे ; गाफिल राहू नका मैदानात उतरण्याची तयारी
करमाळा समाचार

मांगी तलावातील पाणी नेण्याच्या निर्णयाला सध्यातरी स्थगिती मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पण यासाठी आपलं योगदान किती? याकडेही शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तालुक्यातील विविध भागातील सामाजिक कार्यकर्ते आपल्या भागात येऊन आंदोलन करतात पण आपण त्या ठिकाणी उपस्थित राहून हजेरी लावतो का? हा मोठा प्रश्न आहे. तरीही मोजक्या लोकांनी केलेल्या आंदोलनाचा तीव्रता व पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची गांभीर्य वरिष्ठांपर्यंत पोहोचणे व स्थानिक नेत्यांच्या पाठपुराव्याला यश आले. पण हे यश कायमचे आहे का? त्यामुळे गाफिल राहू नका.

मांगी येथून हळगावला जाणाऱ्या पाण्याच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्ते शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. विधान परिषद अध्यक्ष व कर्जत जामखेड चे माजी आमदार राम शिंदे यांना पत्रकारांचे थेट प्रश्न यामुळे चर्चा झाली. त्यातही जवळपास 22 गावांचा समावेश असणाऱ्या मांगीतलाव परिसरातील गावातून मोठ्या प्रमाणावर शेतकरी उपस्थित राहणे अपेक्षित होते. परंतु यातही राजकीय हस्तक्षेप व आळशी भूमिका यामुळे लोकांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला नसल्याचे दिसून आले होते. पण आंदोलन एकाने करू किंवा शेकडोने हा विषय महत्त्वाचा नसला तरी आपण आपली भूमिका ओळखणे गरजेचे आहे.
सदरच्या आंदोलनामध्ये प्रामुख्याने दशरथ आण्णा कांबळे, सुजित बागल, भरत आवताडे, दादासाहेब जाधव, सचिन काळे, दिनेश भांडवलकरसंपत बागल, अजय बागल अमोल घुमरे, बाळासाहेब घाडगे, सुदर्शन शेळके, वैभव बागल, निखिल बागल अनिल बागल, अभिजीत वाघमोडे, संतोष वाघमोडे, शहाजी झिंजाडे, विकास गायकवाड, अंगत भाडवलकर, , हरिभाऊ झिझाडे यासह विविध भागातून आलेले शेतकरी दिसून आले पण 22 गावांचा हिशोब केला तर प्रत्येकी गावातून 100 लोकांच्या हिशोबाने दोन ते तीन हजार लोक संबंधित ठिकाणी येणे अपेक्षित होते.

दरम्यान भाजपा नेत्या रश्मी बागल यांनी पुढाकार घेऊन संबंधित पत्रावर स्थगिती मिळवली असली तरी शासनात काम करणारे नेते मंडळी अतिशय चतुर व चाणाक्ष आहेत. त्यांना लोकांचा उद्रेक कसा शांत करायचा याचा पूर्ण हातखंडा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गाफील न राहता या संदर्भात होणाऱ्या व लोकहिताच्या प्रत्येक आंदोलनात जातीने लक्ष देण्याचे गरज आहे. त्यामुळे गाफील राहू नका जे लोक तुमच्या हिताचे प्रश्न घेऊन येतील त्यांना पाठिंबा द्या. म्हणजे आपसूक तुमचे प्रश्न वरिष्ठ पातळीवर पोहोचून त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल.

