करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

चिवटेंनी न्यायालयात मांडली बाजु ; तीघांमुळे पाचशेंचे नुकसान कर्मचाऱ्यांची खंत

करमाळा समाचार


आदिनाथच्या साखर विक्री मधून प्रतिक्विंटल 150 रुपये प्रमाणे तीन कोटी 47 लाख रुपये रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी न्यायालयाच्या आदेशाने शिखर बँकेत राखीव ठेवण्यात आली आहे. गेली तीन वर्षापासून ही रक्कम बँकेत असून या रकमेला बँक कोणतीही व्याज देत नाही. ही रक्कम कामगारांच्या कष्टाची हक्काची रक्कम ती सर्व कामगारांना सम प्रमाणात मिळण्यासाठी न्यायालयात वाद सुरू आहे.

ही पगार सर्व पाचशे कर्मचाऱ्यांना पगारीच्या प्रमाणात सम प्रमाणात वाटावी अशी सर्व कामगारांची मागणी आहे. मात्र याला १४ कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेऊन ही रक्कम वाटण्यास अडकाठी केली आहे. याप्रकरणी सोलापूरच्या कामगार न्यायालयात केस सुरू आहे.

शासन नियुक्त आदिनाथ कारखान्याची प्रशासकीय संचालक महेश चिवटे न्यायालयात हात वर करून न्यायाधीशांकडे आपले मान्य मागणी म्हणणे मांडण्याची विनंती केली. यावेळी न्यायाधीशांनी परवानगी दिल्यानंतर स्वतः महेश चिवटे यांनी न्यायालयात सुमारे वीस मिनिट बाजू मांडून ही सर्व रक्कम निलंबित केलेल्या 14 कर्मचाऱ्यासह सर्व कर्मचाऱ्यांना पगारीच्या प्रमाणात समप्रमाणात वाटण्यास तात्काळ मान्यता द्यावी अशी मागणी केली.

या पैशांमधून आदिनाथ च्या प्रत्येक कर्मचाऱ्याला 70 हजार ते एक लाखापर्यंत ची रक्कम मिळणार आहे. सध्या आदिनाथ कारखान्याचे 65 पगार थकलेले असून अशा अडचणीच्या काळात कर्मचाऱ्यांना ही मोठी मदत होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलांचे शिक्षण, दवाखान्याचे खर्च, लग्नाचे खर्च, उपजीविकेसाठी लागणारे खर्च यासाठी ही रक्कम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

यामुळे सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ निर्णय द्यावा अशी मागणी न्यायालयापुढे प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांनी केली. या प्रकरणात निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांनी आमच्या निलंबित काळातील जवळपास एक कोटी 43 लाख रुपये आम्हाला द्यावेत व उरलेली रक्कम कामगारांना द्यावी अशी मागणी केलेली होती.

मात्र साखर विक्रीतून जमा झालेली रक्कम साखर उत्पादित झालेल्या काळातील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरावी असे आदेश न्यायालयाचे आहेत. यामुळे ही मागणी चुकीची असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

निलंबित कर्मचाऱ्यांनी आपल्या नुकसानीचा दावा उच्च न्यायालयात केलेला असून त्या दाव्याचा शिखर बँकेत असलेल्या पैशाची कसलाही संबंध नाही असे लेखी मत पाचशे कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आले आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी अकरा ऑगस्ट रोजी होणार असून या निकालाकडे आदिनाथ कारखान्याच्या पाचशे कर्मचाऱ्यांची लक्ष लागून राहिले आहे.

या प्रकरणात आदिनाथ कारखान्याच्या वतीने एडवोकेट दामले कामकाज पाहत असून निलंबित चौदा कर्मचाऱ्यांच्या वतीने एडवोकेट बीटी जाधव काम पाहत आहेत. तर पाचशे कर्मचाऱ्यांच्या वतीने एडवोकेट सुनील जाधव कामकाज पाहत आहेत.

आमच्यातीलच फक्त तीन कर्मचारी पाचशे कर्मचाऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे पाप करत आहेत. आज काही कर्मचाऱ्यांच्या घरात पगार नसल्यामुळे चूल पेटत नाही. अनेकांना उपचार करण्यासाठी पैसे नाहीत. मुलांच्या शिक्षणाला पैसे नाहीत अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक 500 कर्मचाऱ्यांना वेठीस धरून त्रास देणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांचा चेहरा उघड झाला आहे अशी प्रतिक्रिया खंडेराव देशमुख यांनी दिली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE