“क्या घंटा जानते हो ?” पासुन आपल्याकडे घंटागाडी येते का ? पर्यतचा प्रवास ; गायकवाड यांच्याकडुन आदर्शवत कामाला सुरुवात
करमाळा समाचार

एकीकडे पत्रकारांना विचारलेल्या प्रश्नावर त्या “घंटा जानते हो क्या” असे म्हणून उलट प्रश्न विचारणाऱ्या नेत्यांची प्रवृत्ती एकीकडे आणि करमाळ्यात नूतन नगरसेवक पदी निवड झालेल्या सचिन गायकवाड यांचा आदर्श दुसरीकडे, ज्या पद्धतीने सध्या सचिन गायकवाड यांनी कामाला सुरुवात केली व घंटा जानते हो ? म्हणण्यापेक्षा आपल्याकडे घंटागाडी येते का ? असे विचारणारा नेता सध्या उपलब्ध झाल्याने प्रभागात नागरिकांनी कौतुकाचा वर्षाव केल्याचे दिसून येत आहे. नगरपरिषद निवडणूक पार पडताच कामांचा धडाका सुरू केलेले गायकवाड यांच्या कामाचं व त्यांच्या नियोजनाचे कौतुक होऊ लागले आहे. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून प्रभागातील अडचणी जाणून घेऊन त्यावर तात्काळ तोडगा काढण्याचं काम सध्या केलं जात आहे.

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश मध्ये भागीरथपुरा येथे दूषित पाणी पिल्यामुळे दहा जणांचा मृत्यू तर दीडशे पेक्षा जास्त लोक दवाखान्यात भरती केले होते. दरम्यान त्या ठिकाणचे मंत्री कैलास विजयवर्गीय यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पत्रकारांना उत्तर देण्याऐवजी “क्या तुम घंटा जानते हो” असे उत्तर देऊन उलट प्रश्न केला, अशा परिस्थितीत नेते मंडळी हे जनतेला जबाबदेही असतात हे ते विसरून गेले व हम करे सो कायदा याच पद्धतीने चालणार असेही त्यांनी कृतीतून दाखवून दिले. ही माहिती देण्याचं कारणच असं आहे की, ज्या पद्धतीने संबंधित मंत्र्यांनी क्या घंटा जानते हो असा प्रश्न विचारला त्या ऐवजी गल्लीबोळातील सामान्य कार्यकर्त्यांसह पदाधिकारी लोकांच्या प्रश्नासाठी मैदानात उतरून घंटागाडी येते का असं जेव्हा विचारू लागतील तेव्हा आपसूकच आपल्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही.
सचिन गायकवाड सामाजिक कार्यकर्ते म्हणून मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत राहिले व नगरपरिषद निवडणुकांमध्ये सर्वसाधारण (OBC) जागा असतानाही त्यांनी आईला त्या जागेवर उभा करून त्यांनी निवडून आणले. लोकांमध्ये असलेली त्यांची संपर्काची पद्धत व युवकांचा आधार यामुळे त्यांच्या सामाजिक कार्याचा आलेख वरच्यावर वाढत दिसून येत होता. सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन विविध कार्यक्रम साजरे करणे व सामाजिक कार्यात लोकांना सहकार्य करणे हे काम मागील अनेक वर्षापासून बाबुराव गायकवाड प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून केले जात होते. त्याचं फळही त्यांना या निवडणुकीत मिळाल्याचे दिसून आलं मोठ्या फरकाच्या मताने गायकवाड यांचा विजय झाला. तर त्यांनी यात समाधान न मानता लगेच दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली व गल्लीबोळातील साफसफाई व विविध कामांना प्राधान्य दिले.

सध्या त्यांनी प्रभागासाठी एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला असून त्यामध्ये सर्व गटातटाच्या लोकांना एकत्र घेऊन रोज सकाळी आपली काय अडचण आहे का ? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याच्या माध्यमातून लोकही आपल्या भागातील अडचणी त्यावर टाकू लागले. तर त्याचा पाठपुरावा करून सचिन गायकवाड यांनी प्रश्न सोडवण्यासाठी सुरुवात केली आहे. मुळातच ज्या लोकांसाठी आपण काम करतो या लोकांनी आपल्या तक्रारी मांडणं व त्याला व्यासपीठ उभा करणे हे संबंधित नेत्याचं काम आहे आणि हे व्यासपीठ सचिन गायकवाड यांनी उपलब्ध करून दिल्याने सकाळी पाणी येत नाही, स्वच्छता नाही, घंटागाडी आली नाही अशा वेगवेगळ्या कामांसाठी व शुल्लक गोष्टींसाठी ही आता नागरिक तक्रारी करू लागले आहेत. तर तात्काळ त्यावर तोडगा काढत सचिन गायकवाड यांनी प्रश्न मार्गी लावण्यास सुरुवात केली आहे. याच पद्धतीने प्रत्येक विभागातून प्रत्येक प्रभागातून नगरसेवकांनी आपला व्हाट्सअप ग्रुप करून जनतेचे प्रश्न सोडवल्यास कोणतीच अडचण राहणार नाही हे निश्चित आहे.

