करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

हिरडगाव मध्ये थकीत उसाच्या बीलापोटी सुरू केलेले उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित

करमाळा समाचार :-

विक्रम ( विकी ) बबनराव पाचपुतें यांच्या खाजगी मालकीचा श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील साईकृपा शुगर & अलाईड इंडस्ट्रीज लि. या कारखान्याचे सन २०२२-२३ चे २७०० रुपये प्रति टना प्रमाणे बाजार भाव देऊ असे सांगून करमाळा आणि परांडा तालुका येथील शेतकर्‍यांना अद्यापपर्यंत सुमारे ६ महिने उलटून दमडीही न दिल्याने शेतकर्‍यांनी श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. दरम्यान तहसीलदार श्री मिलिंद कोलते यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते उपोषण स्थगित केले आहे अशी माहिती ॲड राहुल सावंत ( अध्यक्ष हमाल पंचायत व माजी सदस्य पंचायत समिती ) यांनी दिली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, सन २०२२-२३ या गळीत हंगामासाठी विक्रम ( विकी ) बबनराव पाचपुते यांच्या खाजगी मालकीचा साईकृपा शुगर & अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड हिरडगाव या कारखान्याने श्रीगोंदा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्य़ातील करमाळा आणि परांडा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतिटन २७०० रुपये बाजार भाव देऊ असे सांगून उस गाळपासाठी आणला. ऊस गाळपानंतर १४ दिवसात २७०० रुपये प्रमाणे प्रति टन रक्कम देणे बंधनकारक असताना ही सुमारे ६ महिने उलटून गेले तरी वेळोवेळी पत्र व्यवहार करून, पाठपुरावा करून हेलपाटे मारूनही अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये कारखाना प्रशासनाने दिले नाहीत.

या उलट कारखान्याने प्रत्येक शेतकर्‍यांच्या उसाच्या वजनाचे ५ टक्के वजनात व वाहतूक कपात केली आहे. सध्या मुलांचे शिक्षणासाठी वह्या, पुस्तके, फी, कपडे तसेच शेतीसाठी खते, औषध, बी बियाणे ,मशागतीसाठी आमच्याकडे पैसे तर नाहीतच उलट बँक पतसंस्था यांचे कर्ज आणि हात उसनवारी घेतलेले पैसे. यांचेच व्याजदर वाढत चालले आहे. तर कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अन्यथा आमचे करमाळा व परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे बिलाची रक्कम व्याजासह त्वरित देण्यात यावे यासाठी अँड. राहुल सावंत (मा. सदस्य पंचायत समिती करमाळा), बाळासाहेब गायकवाड (तालुकाध्यक्ष रयत क्रांती शेतकरी संघटना करमाळा),

राहुल चव्हाण (मा. सरपंच परांडा), विलास बरडे, सुखदेव चव्हाण, नंदकुमार पाटील, सुनील चव्हाण, अंगत चव्हाण, नाना चव्हाण, हनुमंत पाटील, देविदास पाटील, वसंत चव्हाण, धनंजय कुलकर्णी , सुभाष गणेशकर ,दत्तात्रय सरोदे, रमेश पाटील, बाबासाहेब पाटील, युवराज दळवी, सुग्रीव चव्हाण, सोमा धनवे, अनिल पुंडे ,वालचंद रोडगे, नवनाथ कोळेकर, बापू जाधव ,रामदास मोडके, सुरज मोडके, युवराज पडळकर , रणजीत बेरगळ, संकेत मल्लाव ,महादेव मस्के ,वैभव मस्के, आकाश कुरकुटे ,गजानन गावडे, सागर सामसे, बापू उबाळे व शेतकरी करमाळा व परांडा यांनी दि. ५/६/२०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून श्रीगोंदा तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले होते .

त्या दरम्यान तहसीलदार श्री मिलिंद कुलथे यांनी शेतकऱ्यांची ऊस बिलाची रक्कम 20 जून 2023 पर्यंत देऊ असे लेखी पत्र दि. 5/ 6/ 2023 रोजी दिले. यावेळी तहसीलदार मिलिंद कुलथे म्हणाले की, आम्ही यापूर्वी पहिली आर आर सी कारवाई ची नोटीस बजावली आहे तसेच दुसरी आर आर सी कारवाई ची नोटीस लगेच काढली असून तुमचे ऊस बीलाची रक्कम 20 जून पर्यंत अदा करण्यात येईल त्यामुळे उपोषण कर्त्यांनी 20 जून 2023 पर्यंत सदरचे उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील विक्रम बबनराव पाचपुतें यांच्या खाजगी मालकीचा हिरडगाव येथील साईकृपा शुगर & अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्याला केंदीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती उद्योग समुह नागपूर यांना भागीदारीत कारखाना चालविण्यास दिला आहे अशी चर्चा होती त्यामुळे तुमच्या उसाच्या पेमेंटची काहीच अडचण नाही असे सांगितले. त्यामुळे आम्ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर विश्वास ठेवून त्या कारखान्यास ऊस दिला.

याबाबत सर्व वरिष्ठ संबंधित कार्यालय यांच्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार आणि तक्रार करूनही शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामाचा एक रुपयाही अद्यापपर्यंत मिळाला नाही. तरी आमचे ऊस बिलाची रक्कम 20 जून 2023 पर्यंत मिळावी अन्यथा सामुहिक आत्मदहन करणार असा इशारा अँड राहुल सावंत मा. पंचायत समिती सदस्य करमाळा यांनी दिला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE