शिंदेचा कागदावरचा विकास प्रत्यक्षात दिसू लागला ; आदिनाथ बाबतही मांढरेचे वक्तव्य चर्चेत
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात प्रशासकीय कार्यालय परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे मा. आ. संजयमामा यांच्या विकासकामांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांनी “संजयमामांचा विकास हा केवळ कागदावरचा विकास आहे,” अशी टीका केली होती. मात्र आता प्रत्यक्षात सुरू असलेली विकासकामे पाहून ती टीका फोल ठरत असल्याचे अनेक नागरिकांकडून बोलले जात आहे.

प्रशासकीय कार्यालय परिसरातील अंतर्गत रस्ते तसेच केतूर नाका ते शासकीय विश्रामगृह या मार्गावरील रस्त्याचे काम वेगाने सुरू असून, या भागाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती आणि इतर महत्त्वाची शासकीय कार्यालये याच परिसरात असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांची येथे मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मा. आ. संजयमामा यांनी मंजूर करून आणलेल्या विकास निधीतून ही कामे होत असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
सर्वसामान्य नागरिकांमध्ये संजयमामा यांच्या विकासकामांबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून, प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कामावर विश्वास ठेवणारे आणि दूरदृष्टीने विकासाचे नियोजन करणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असल्याचे मत व्यक्त होत आहे.

तालुक्यासाठी महत्त्वाचे ठरणारे एमआयडीसी, रिटेवाडी उपसा सिंचन योजना, संगोबा येथील सीना नदीवरील पूल, मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज यांसारखे शिक्षण, रोजगार आणि पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी संजयमामा यांची आवश्यकता असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. याउलट विरोधक या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडताना दिसत नसल्याचेही बोलले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील यांनी दावा केला की, आदिनाथ साखर कारखान्याच्या बाबतीत संजयमामांना रोखण्यासाठी मोठे षड्यंत्र रचण्यात आले. तसे झाले नसते, तर आज आदिनाथ कारखान्याचे चित्र वेगळे असते, असे त्यांनी सांगितले.

