जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले
जिजाऊ ब्रिगेड जेऊर तालुका करमाळा यांच्यावतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 वी जयंती कोरोना नियमाचे पालन करून मोजक्याच भगिनीच्या उपस्थितीत व जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष शिवमती पल्लवी शिदे यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली .
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमीत्त जिजाऊ ब्रिगेड च्या प्रियांका खटके या विचार मांडताना म्हणल्या,
आंबेडकरांचे अलौकिकत्व अन्यसाधारण होते . ज्या कुटुंबात त्यांचा जन्म झाला त्या कुटुंबातील शंभर पिढ्या या अत्यंत वाईट रीतीने वागविण्यात आल्या होत्या. त्यांचा स्पर्श अमंगल मानला जात होता. त्यांच्या सावलीला विटाळ मानण्यात येई. आंबेडकरांच्या जीवनाने हे सिद्ध केले की ,पददलित जातीच्या बिजामध्ये उत्कर्षाची शक्ती नष्ट झालेली नाही. जो मनुष्य आपल्या व्यक्तित्वाचा विकास अखंड उद्योग, व्यासंग,तळमळ, कळकळ, अलौकिक धैर्य आणि स्वार्थत्याग या गुणांवर करावयाचा निर्धार करतो त्याच्या मार्गात वर्गाची, जातीची , विशेष अधिकाराची व श्रीमंतीची धोंड आड येऊ शकत नाही.
समाज बदलासाठी सचोटीची आणि बुद्धिमान माणसे पाहिजेत. आपल्या अन्य बांधवांचे विषयी ज्यांना आदर वाटतो,आणि साचेबंद निर्बंधापासूनमुक्त अशा समाजव्यवस्थेचा आदर्श ज्यांच्या डोळ्यापुढे असतो, अशी बुद्धिनिष्ठ आणि स्वाभिमानी माणसे हे जग घडवू शकतील असा विश्वास आंबेडकरांना वाटत होता. पददलित मानवांना त्यांचे जीवन हे धडे देत आहे. जो वर्ग व्यक्तीचा उत्कर्ष आणि कामगिरी ही विशिष्ट वर्गाची सत्ता आहे असे समजतो त्या वर्गाच्या मग्रुरीवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्दयपणे प्रहार केले.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांसारखा पुरुष पुन्हा होणार नाही . कारण’ तिरस्करणीय गुलामगिरी आणि अमानुष अन्याय यांच्या गर्तेत पिचत पडलेल्या या समाजात मी जन्मास आलो आहे. त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपेशी ठरलो. तर स्वतःला गोळी घालीन, अशी घनघोर प्रतिज्ञा आंबेडकरांनी केली होती. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचे उच्चाटन झाले आहे. ती प्रतिज्ञा पूर्ण झाली. स्वप्न साकार झाले. आपली महत्वकांक्षा सफल झाली. गुलामगिरी नष्ट झाली. त्यांनी असे अभिवचन दिले होते. ते त्यांनी आपले बोल खरे करून दाखवले.
बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तकावर अतिशय प्रेम होते
अशा विश्वभुषण आंबेडकर यांच्या आलौकिक जीवनाने भारतात दलित वर्गाला ज्ञानाचे एक नवीन तीर्थ निर्माण झाले. या भक्तांसाठी नवीन प्रेरणेचे एक केंद्र जन्मास आले आहे. त्या जीवनातून एक नवी देवता अवतरली आहे. आणि ह्या मंदिरमय देशातील त्या देवतेच्या मंदिरातील तो नंदादीप जगातील कुठल्याही कोपऱ्यातून प्रकाशत असलेला दिसतो आहे. तसेच त्यांनी शेतक-यांच्या समस्या मांडणारं पुस्तक लिहलं होत त्यात, शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीतठेवा , बाकीच्यांना तेथून बाहेर काढा नी उद्योगा , व्यापार , शिक्षण, सेवाक्षेत्रात घाला. शेती माला लायाक बाजारभाव , सिंचन आणि उद्योगाचा दर्जा मिळायला हवा हे उपाय तातडीने केलेनाहीत तर शेतकरी आत्महत्यांच भाकीत त्यांनी १०० वर्षांपूर्वी केलं होतं. ज्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला कायद्यांचे संविधान दिल अशा महामानवाला अभिवादन.
यावेळी जेऊर शहराध्यक्ष शिवमती पुनम कदम,आरती शिंदे,सुजाता जाधव,गंगा लोंढे,शैला घाडगे, सुवर्णा घाडगे, माया कदम,मनीषा गरड, कल्पना गरड, मयुरी गरड,शितल घोलप, पूनम कारकर,आरती गारुडी,विमल शिंदे या उपस्थित होत्या.