करमाळासोलापूर जिल्हा

नो ड्युज प्रकरणी लक्ष देऊन संबंधित सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी – माजी आमदार नारायण पाटील

करमाळा समाचार 

करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर म्हैसगाव ता माढा कारखान्याने काढलेले विनासंमती बोगस कर्जप्रकरण मिटवताना आ. संजय शिंदे व संबंधित बँका शेतकऱ्यांची आणखी फसवणूक करण्याच्या तयारीत असुन या विषयी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही दस्त ऐवज कागदपत्रांवर सही करु नये, असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना मा आ पाटील यांनी सांगितले की आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीवर मोफत खते देतो असे आमिश दाखवून महत्वाची कागदपत्रे आपल्या म्हैसगाव ता माढा येथील विठ्ठल कार्पोरेशन लि या खाजगी साखर कारखान्याच्या माध्यमातून गोळा केली. परंतू शेतकऱ्याला खते देणे तर दुरच, त्यांची आधार व सातबारा उतारे वापरुन विनासंमती कर्ज काढले. राज्यातील विविध बँकांकडून अशी कोट्यावधी रुपयांची कर्जे काढली व सदर रक्कम वैयक्तिक कामासाठी वापरली. शेतकर्‍यांच्या हातात बँकानी पाठवलेली कर्जफेडी संदर्भातील जप्ती नोटीस हाती पडल्याने हा प्रकार उजेडात आला. यानंतर आमदार शिंदे यांनी सावरासावर करत संबंधित बँकाशी वन टाईम सेटलमेंट (एक रकमी परतावा) करत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला.

परंतू मागील आठवड्यात परत एकदा शेतकऱ्याला संबंधित बँकेने नो ड्युज दाखला पाठवून दिला आहे. आणि महत्त्वाची बाब म्हणजे बँकेचा हा नो ड्युज दाखला घेऊन बँक कर्मचारी नव्हे तर विठ्ठल कार्पोरेशन लि या आ संजय शिंदे यांच्या खाजगी कारखान्याचे चीट बाॅय कर्मचारी शेतकऱ्याला हा दाखला देत आहेत व एका कागदावर आमची विठ्ठल कार्पोरेशन लि या कारखान्या बद्दल कसलीही तक्रार नसल्याचा उल्लेख असलेल्या मजकुराखाली सही घेत आहेत. हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असून परत एकदा शेतकऱ्याची विठ्ठल कार्पोरेशन या कारखान्याकडे पुर्वी जमा असलेली कागदपत्रे पुन्हा एकदा वापरुन त्यावर इतर बँकाकडून नवीन कर्ज काढण्यासाठी होत असावा अशी दाट शक्यता आहे. कारण कोणतीही बँक ही जर खातेदार अथवा कर्जदाराने नवीन कर्जप्रकरणी नो ड्युज सर्टीफिकेट मागणी केली तरच बँक सदर दाखला देते.

आता शेतकरी मागणी करत नसताना त्यांना हा दाखला देण्यामागचा बँकेचा उद्देश काय आहे याची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी. या नो ड्युज दाखल्यावर मागील आ संजय शिंदे यांच्या कारखान्याने उचललेले कर्ज हे पिक कर्ज होते असा उल्लेख आहे. यामुळे तर यातील सर्व प्रकार हा पुर्ण फसवणुकीचाच आहे हे सिध्द होत आहे. शेतकर्‍यांच्या नावावर पिक कर्ज म्हणून रक्कम शेतकऱ्याला माहिती न देता व माहीती होऊ न देता काढायचे व शासनाच्या कर्जमाफी या कर्जप्रकरणांचा समावेश झालाच तर कोट्यावधी रुपये वरच्यावर वापरुन वापरुन स्वतः चे खिसे भरावयाचे असा डाव असण्याचे आता नाकारता येत नाही.

यामुळे तहसिलदार व जिल्हाधिकारी यांना आपण या नो ड्युज प्रकरणी लक्ष देऊन संबंधित सर्व प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी, अन्यथा परत एकदा करमाळा तालुक्यातील शेतकऱ्याला फसवले जाण्याची शक्यता आहे. यामुळे हा प्रकार तात्काळ थांबवून शेतकऱ्यांवर होऊ घातलेल्या अन्यायाचे वेळीच निवारण करावे व दक्षता घ्यावी अशी विनंती करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले.

मागील काही दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यातील चंद्रकांत अंबादास अंबारे व समाधान चंद्रकांत अंबारे (रा गौंडरे) तसेच तांबे भाऊसाहेब बिरमल, बंडगर अजिनाथ दत्तात्रय, शिंदे सुनीता रामचंद्र, सय्यद यहंमद हमद सय्यद, पटेल शहागीर मुसा, शिंदे कलावती गोविंद (सर्व रा आवाटी) या शेतकऱ्यांनी युनिअन बँक मेन शाखा सोलापुर यांच्या कडून नो ड्युज दाखला मागणी न करता विठ्ठल कार्पोरेशन लि कारखान्याचे कर्मचारी घरी जाऊन देण्याचा प्रकार घडलेला आहे व एका कागदावर विठ्ठल कार्पोरेशन लि या कारखान्या विरोधात कसलीही तक्रार नसल्याचे शेतकऱ्यांकडून लिहून घेतले जात आहे. याबद्दल शेतकरी आता थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या कडे तक्रार दाखल करणार असल्याचे समजते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE