पोलिसांवरील विश्वासाचा अंत? ; शेतकऱ्यांची पोलिसाकडे पाठ – तक्रार देणे टाळलं
करमाळा समाचार

आधीच पाऊस नसल्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर झालेला आहे. त्यात चोरट्यांनी त्यांचं हैराण करून टाकलं आहे. लाखो रुपयांचे उलाढाल असणाऱ्या मोटारींचा जणूकाही बाजार चोरट्यांनी मांडलेला आहे. याबाबत चर्चा होत्या पण आता एका दैनिकात आलेल्या बातमी ने मोर्तब केले आहे. पोलीस तपास व गुन्हा नोंदवण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांनी चक्क पोलिसांवर अविश्वास दाखवत गुन्हाच दाखल न करण्याचे ठरवल्याची वृत्त वाचले आणि धक्काचं बसला. यापेक्षा लाजिरवाणी बाब काय असेल?

मागील अनेक दिवसांपासून तालुक्यात नदीकाठच्या गावांमध्ये तसेच विहिरींवरील पाण्याच्या मोटारी चोरीला जात आहेत. मोठ्या मोटार मधून वायर चोरीला जात आहे. याचा एकाचाही तपास तर लागतच नाही पण तक्रारी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून केवळ अर्ज घेऊन माघारी पाठवलं जात असल्याच्या तक्रारी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी केल्या आहेत. त्यामुळे गुन्हे दाखल होण्याचं प्रमाणही अत्यल्प आहे. त्यामुळे शोध घेण्याचं काम अगदी संथ गतीने सुरू असल्याचे दिसून येते.
नुकतच रामवाडी येथील शेतकऱ्यांच्या मोटारी चोरीला गेल्या आहेत. अतिशय गंभीर बाब म्हणजे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी तपास यंत्रणेवरच अविश्वास दाखवत तक्रार करण्याचे टाळण्याची बाब चव्हाट्यावर आली आहे. एका दैनिका मध्ये आशा गंभीर विषयाकडे लक्ष वेधले असून त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. आधीच शेतकरी मेटाकुटीला आला असून केवळ त्याची मोटर चोरीला जात नाही तर संसार उघड्यावर पडत आहे. अशा परिस्थितीत बघायच्या भूमिकेत असलेल्या सर्वांनीच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.


