करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

२६ च्या आंदोलनावर शेतकरी ठाम ; मकाई च्या बीलासाठी झालेल्या बैठकीत निर्णय

करमाळा समाचार

मकाई सहकारी साखर कारखान्याचे थकीत ऊस बिल मिळण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार आम्ही बिल मिळण्यासाठी 25 जानेवारीपर्यंत वाट बघु अन्यथा 26 जानेवारीला करमाळा तहसील कार्यालयावर आम्ही शेतकरी कुटुंबासह आत्मदहन आंदोलन करणार असल्याचे प्राध्यापक रामदास झोळसर यांनी बैठकीत बोलताना सांगितले. या संदर्भात शेतकरी बांधवांसमवेत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्यावतीने तहसीलदार पोलीस निरीक्षक करमाळा यांना देण्यात आले असून सदर निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जिल्हाधिकारी सहकार मंत्री सहकार आयुक्त महाराष्ट्र राज्य साखर संघ यांना देण्यात आले आहे .

या निवेदनात असे म्हटले आहे की शेतकरी वर्गामध्ये ऊस बिल न मिळाल्यामुळे तीव्र असंतोष पसरला असून आर्थिक अडचणी दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अवस्था न घर का घाट का अशी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सहकुटुंब आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 25, जानेवारीपर्यंत बिल मिळणे ही काळाची गरज आहे. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत बिल मिळण्यासाठी 16 जानेवारीला करमाळा येथील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शेतकरी कामगार पक्षाचे नेते दशरथ कांबळे ॲड राहुल सावंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे, अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने, प्रा. राजेश गायकवाड सर, हरीदास मोरे, वाशिंबेचे माजी सरपंच भगवान डोंबाळे, गणेश वाळुंजकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी ऊस वाहतूकदार यांची बैठक संपन्न झाली.

यावेळी पुढे बोलताना प्राध्यापक रामदास झोळसर म्हणाले की, आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून मकाईचे थकीत ऊस बिल मिळण्यासाठी सामुहिक लढा देत आहे . या बैठकीत बोलताना शेतकरी कामगार नेते दशरथ अण्णा कांबळे म्हणाले की, मकाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकरी कष्टकरी वर्गासाठी आम्ही लढा देत आहोत यात आम्ही कुठलेही राजकारण न करता ‌ आमची ही लढाई अन्याविरुद्धची लढाई आहे. शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे त्यांना 25 तारखेपर्यंत द्या आम्ही भर चौकामध्ये आपल्या सत्कार करू असे आवाहन त्यांनी दिग्विजय बागल यांना केले आहे . पण अन्यायाविरुद्द शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीमध्ये कामगार नेते ॲड राहुल सावंत म्हणाले की, आम्ही मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलासाठी दोन महिन्यापासून सामूहिक लढा देत आहे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका. तुमचे पैसे तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आपण न्यायालयीन लढा देत कारखाना चेअरमन संचालक मंडळ यांच्या मालमत्तेवर बोजा चढून मालमत्ता विकून आपले पैसे हे वसूल करू फक्त तुम्ही या लढ्यामध्ये हार न मानता खंबीरपणे उभे रहा लवकरच आपल्या लढ्याला यश मिळणार आहे. आता ही आरपारची लढाई अंतिम टप्प्यात असून आपला विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र गोडगे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जोपर्यंत आपण संघर्षाची भूमिका घेत नाही तोपर्यंत आपल्याला यश‌ मिळणार नाही. आपली लढाई आपणास लढावी लागणार आहे तुम्ही मनात भिती न बाळगता आपल्या हक्कासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या लढ्यात सहभागी होऊन लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीला मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मकाई थकीत ऊस बिलाबाबत प्रशासनाला निवेदन देऊन आपला असंतोष त्यांनी व्यक्त केला असून 25 जानेवारी पर्यंत ऊस बिल न दिल्यास उग्र आंदोलनाचे रूप धारण करून सहकुटुंब 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सामुहिक आत्मदहन करणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE