करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

उजनी लवकरच मायनस मध्ये जाणार ; धरणग्रस्त चिंताग्रस्त

करमाळा समाचार -संजय साखरे


पुणे, सोलापूर आणि नगर या तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण यावर्षी अपुऱ्या झालेल्या पावसामुळे फक्त 60 टक्के भरले. मात्र धरण कमी भरले तरी पाण्याचे योग्य नियोजन न केल्याने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मायनस मध्ये गेलेले धरण यावर्षी जानेवारीमध्येच मायनस मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उजनी धरणातून सध्या भीमा नदीत 5000 क्यूसेक एवढा पाण्याचा विसर्ग चालू असून दहिगाव उपसा सिंचन योजना 120 ,सीना माढा 297, तर बोगद्याद्वारे 221क्युसेक् एवढा विसर्ग चालू आहे.
भीमा नदीतून सोलापूर सह सांगोला, मंगळवेढा ,सांगोला या शहरांसाठी सोडलेले पाणी 15 जानेवारीपर्यंत चालू राहण्याची शक्यता असून यामुळे धरणातील जवळपास दहा ते अकरा टक्के पाणीसाठा कमी होणार आहे.

उजनी धरणाच्या पाण्याच्या या बेसुमार नियोजनाचा फटका उजनीकाठच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे. गेल्या वर्षी अपुऱ्या पाणी जमिनीतील पाण्याची पातळी खालावली असून शेतकऱ्यांना आता उजनीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे. उजनी बॅक वॉटर पट्ट्यात सध्या केळी या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड चालू असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत आहे. मात्र उन्हाळ्यात उजनीचे पाणी कमी झाल्यास लाईट कपातीची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

असे झाले तर, उजनी काटचा शेतकरी उध्वस्त होणार असून त्याचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. उजनीची पाणी पातळी मोठ्या
प्रमाणावर खालावल्यानंतर काही ठिकाणी दुबार तर काही ठिकाणी तिबार पंपिंग करून पाणी उपसा करावा लागणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.

त्यामुळे उजनी धरणासाठी जमिनी देऊन त्याग केलेल्या शेतकऱ्यांवर “हेचि काय फळ मम तपाला” असे
म्हणण्याची वेळ आली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE