करमाळासोलापूर जिल्हा

PM पीक विमा योजना : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

करमाळा :

प्रधानमंत्री पीकविमा योजना (PM Crop Insurance Scheme) खरीप व रब्बी (Rabi season) हंगामासाठी ‘कप ॲण्ड कॅप (८० : ११०) मॉडेलनुसार अधिसूचित क्षेत्रातील पिकांसाठी विमा क्षेत्र घटक ग्राह्य धरून मान्यता देण्यात आली. योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करावा. विम्याचा भार कमी करण्यासाठी खरिपासाठी (kharif) हप्ता दोन, तर नगदी पिकांसाठी पाच टक्के निश्‍चित करण्यात आला आहे, अशी माहिती श्री रोहिदास मासाळकर तंत्र अधिकारी विभागीय सांख्यिकी पुणे विभाग यांनी दिली.

खरिपात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, भुईमूग, सोयाबीन, कारळा, मूग, उडीद, तूर, कापूस व कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. त्यासाठी एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. मात्र कर्जदार शेतकऱ्यांनी तसे संबंधित बँकेस अथवा पतपुरवठा करणाऱ्या संस्थेस कळविणे बंधनकारक असेल, असे सांगून श्री. रोहिदास मासाळकर म्हणाले, की पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, भूस्खलन, पावसातील खंड, कीड-रोग आदींमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबींमध्ये समाविष्ट आहे.

हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी अथवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांचे काढणी पश्चात होणारे नुकसान, तसेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी देखील या पीक विम्याचे संरक्षण मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्राशी अथवा बँकेशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक, कृषी वीमा प्रतिनिधी, मंडल कृषिअधिकारी, तालुका कृषी अधिकारी करमाळा कार्यालयाशी संपर्क करावा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE