करमाळासोलापूर जिल्हा

क्षत्रिय वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह… रविवार ९ मे रोजी असलेल्या जयंती निमित्ताने अभिवादन ..

करमाळा समाचार

क्षत्रियों की तलवार बिना वजह उठ नहीं सकती और उठ गई तो काम पुरा
किये बिना रुक नहीं सकती !

हिंदू सूर्य मेवाड रत्न अमर राष्ट्रनायक महाराणा प्रताप यांचा जन्म मेवाड मध्ये रविवार ९ मे १५४० साली झाला. मेवाडचे राणा उदय सिंह राणी जयंती बाई यांच्या पोटी कुंभलगड किल्ल्यात या शूर वीर पुत्राने जन्म घेतला. राणा उदयसिंहाने आपला छोटा पुत्र राणा जगमल यांस काही कारणामुळे युवराज घोषित केले. खरे पाहता मोठा पुत्र राजगादीचा खरा वारसदार असतो. असे असले तरी मोठ्या उदार मनाने वडिलांचा मान राखत या निर्णयाचा प्रतापसिंह यांनी स्वीकार केला. महाराणा प्रताप यांनी प्रभू रामचंद्रा प्रमाणे आपल्या राजगादीचा त्याग करून मेवाड पासून दूर जाण्याचे ठरवले. पण म्हणतात ना नशिबात जे विधिलिखित असते तेच घडते. मेवाडच्या सरदार व सामंतांनी महाराणा प्रतापसिंह यांनाच सिंहासनावर बसवण्याचा आग्रह धरला. कारण ते ज्येष्ठ पुत्र आहेत आणि ते अधिक साहसी ,निडर व शस्त्र चालविण्यात तरबेज, चाणाक्ष आहेत. असे सांगत त्या सर्वांनी राजा ऊदयसिंहाच्या मनाची तयारी केली. परिणाम स्वरूप १ मार्च १५७३ रोजी वयाच्या 32 व्या वर्षी मेवाडच्या सिंहासनावर महाराणा प्रतापसिंह यांचा राज्याभिषेक झाला. महाराणा प्रताप यांच्या भाल्याचे वजन
८0 किलो त्यांच्या शरीरावरील चिलखत एकशे दहा किलो वजनाचे तर तलवारीचे वजन ही काही कमी नव्हते. अशा सर्व बलवान धारदार शस्त्रासह अश्वरुढ होऊन ते युध्दात उतरत. शत्रूशी कसे लढावयचे? हे एक क्षत्रिय जाणतो.

यापूर्वीही मातृभूमीसाठी अनेकांनी बलिदान दिले होते. यात वीर राजपूत क्षत्राणी राण्या ही काही कमी नव्हत्या. त्यांनीही आपल्या शीलाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आगीत आपल्या प्राणाची आहुती दिली होती.ज्याला इतिहासात जोहर म्हणून ओळखले जाते. ‘चित्तोड जोपर्यंत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत मी राजगृहात राहणार नाही. पंचपक्वान्न खाणार नाही. सोन्या चांदीच्या ताटात जेवणार नाही. अशी महान प्रतिज्ञा महाराणा प्रतापसिंह यांनी घेतली होती.’ एवढी महान देशभक्ती आज कोठे दिसते? जोपर्यंत शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आपण चितोड मुक्तीसाठी लढू अशी शपथ त्यांनी घेतली होती. महाराणा प्रतापसिंह यांचा इतिहास म्हणजे एक गौरवशाली गाथाच आहे. वीर क्षत्रिय राजपूत योद्धा महाराणा प्रताप सिंह यांस आपला मांडलिक बनवण्यासाठी अकबराने जंग जंग पछाडले होते. परंतु दोघांमध्ये समझोता होऊ न शकल्याने दोघेही युद्धास तयार झाले. त्यावेळी महाराणा यांनी
आपली राजधानी दुर्गम अशा अरवलीच्या पर्वतात कुंभलगड येथे नेली होती.

प्रताप सिंहाने आपल्या सैन्यात वनवासी, भिल्ल अशा अनेकांना सामील करून घेतले होते. त्यांना युद्धाचे प्रशिक्षणही दिले. तलवारबाजी भालाफेक ,गनिमीकावा पद्धत अशा अनेकविध नीती शिकवल्या. या सर्वांना घेऊन अकबर विरोधात लढण्यास ते तयार झाले.सूर्याची तेजस्विता आणि हरणाची चपळता असलेले वीर राणा प्रतापसिंह तळपत्या तलवारीने शत्रू सैनिकांचा धुव्वा उडवत रणांगण गाजवत होते. शूर आणि धाडसी असलेल्या वीर महाराणा ने शत्रु सैनिकांना पूर्णपणे नामोहरण केले. तरीही हळदी घाटीच्या युद्धात राणा प्रतापसिंह यांना माघार घ्यावी लागली. हे जरी खरे असले तरी पराक्रमी राणाने आपल्या तलवारीने शत्रू सैनिकांना सळो कि पळो करून सोडले होते. महाराणा ची एक गर्जना होती.”मी एक लिंगजीला साक्षी ठेवून. निर्धाराने सांगतो की जोपर्यंत माझ्या अंगात प्राण आहे तोपर्यंत मी मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी सतत संघर्ष करीत राहील.” त्याकाळी आपल्या सैन्यात एकी क्षात्रतेज व बळ निर्माण करणारा तो एकमेव राजा ठरला.सैन्यात वाढ करून त्यांनी मेवाड प्रांत ताब्यात घेतला. अखेरचा श्वास चालू असतानाही आपल्या पुत्राकडून वचन मागितले पुत्रा _”मी माझे संपूर्ण आयुष्य युद्धात व संघर्षात घालविले.

सध्या बहुतांशी भाग मी जिंकले ला आहे पुढेही तुला असा संघर्ष करून आपले अस्तित्व टिकवावे लागणार आहे. चित्तोड जिंकण्यासाठी मी जो त्याग केला त्याचे भान ठेवून पुढील तयारीस सज्ज राहा” असे सांगत सांगतच त्यांनी प्राण सोडले. राज्याची काळजी करत असतानाप्राण सोडणाऱ्या राजा महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्याला खरंच तोड नाही. त्यांच्या मृत्यूची वार्ता ऐकून अकबर रडला होता.अशा शूर वीर तळपत्या हिंदूसूर्याला महाराणाला जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.

✍🏼अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE