माणुसरुपी बिबटे सक्रिय पोलिसांचा पिंजऱ्यात कधी अडकणार
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात सुरुवातीला बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले सुरूच असताना आता माणसाच्या रूपातली बिबटे ही सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. गावोगावी शेळ्या मेंढ्या व जनावरे चोरीचे प्रमाण वाढले आहे. अशावेळी पोलिसांकडून कडक कारवाई आणि तपासाचे अपेक्षा असताना मात्र सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहिती सहज शक्य होईल अशी परिस्थिती असतानाही चोरटे मात्र मिळून येत नाहीत. यामुळे गावोगावचे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

नुकतच पाथर्डी येथील शेतकरी शितल कुमार मोटे यांच्या वस्ती पासुन काही अंतरावर सीसीटीव्ही असतानाही शेळ्यांची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे काही संशयितही ताब्यात घेण्यात आले होते. परंतु पुढे त्याचे काय झाले हे अद्याप कळू शकलेले नाही. त्यामुळे पशुधनाची चोरी झाल्याने शेतकऱ्यांना आता दिवसभर राबून रात्रभर शेळ्या मेंढ्यांना राखण बसण्याची पाळी आलेली आहे. अनेक ठिकाणी बिबट्या असल्याचे अफवा असताना चोरीचे हे प्रकार घडत आहेत. झालेल्या चोरीचा तपास लागावा अशी मागणी पशुपालक शेतकऱ्यांमधून होत आहे.
अनेक पशुपालक शेळ्या मेंढ्याची चोरी झाली तरी तपास होत नसल्याने पोलीस ठाण्याकडे तक्रार देण्यास फिरकत नाहीत. त्यामुळे अशाच प्रकारामुळे चोराचे अधिकच फावते मात्र दिलेल्या फिर्यादीचाही तपास होत नसल्याने या चोरट्यांना मात्र अभय मिळत असल्याचे दिसत आहे. पाथुर्डी गावात अशीच घटना घडली आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी झालेल्या शेळ्यांच्या चोरीचा तपास अजूनही पूर्ण झालेला नाही.

घटनेच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा संपूर्ण प्रकार कैद झाला असून, त्यात चोरटे दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांना तपास करणे सोपे होईल, अशी अपेक्षा तक्रारदार शीतलकुमार मोटे यांनी व्यक्त केली होती. मात्र तसे न घडल्याने तक्रारदाराने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता तर “चोरी होऊन चार महिने उलटले, गुन्हा दाखल आहे आणि सीसीटीव्हीमध्ये चोरटे दिसत असतानाही पोलीस चोरट्यांना का पकडत नाहीत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करून चोरट्यांना अटक करावी आणि चोरीस गेलेल्या शेळ्या परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी तक्रारदार शितलकुमार मोटे यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

